८ मे, २०१५

पुरोगामी परंपरेचा पोथिवाद

वदतो व्याघात नावाची एक घोडचूक  तर्कशास्त्राने अधोरेखित केली आहे .  त्यात आपले म्हणणे  आपणच खोडून काढत असतो . उदाहरणार्थ  " ती म्हातारी बाई फार तरुणपणिच मरून गेली" .....    म्हातारी बाई तिच्या तारुण्यात  मरू शकत नाही  ! परंपरा पुरोगामी असते काय ? पुरोगामी परंपरा शोधता येते काय ? हा आजच्या लेखाचा विषय आहे.

पुरो + गामी = पुढील प्रगतीच्या + दिशेने जाणारा
परंपरा =  मागील चालू इतिहास





दत्तप्रसाद दाभोलकर म्हणजे नरेंद्र दाभोलकरांचे बंधु.  स्वामी विवेकानंद हे पुरोगामी - धर्म विरोधी - नास्तिकतेच्या आस पास होते असे त्यांचे प्रतिपादन आहे. त्यावर  ते पुस्तके लिहितात भाषणे हि  देतात . भारतीय समाजाला आणि मुख्यत: हिंदु समाजाला पुरोगामी , विज्ञान निष्ठ आणि नास्तिक  बनवावे असा त्यांचा हेतू आहे . दत्तप्रसाद दाभोलकरांच्या  हेतूशी मी सहमत आहे . तरी एक महत्वपूर्ण बदल आदरपूर्वक सुचवतो … विवेकानंदाना नास्तिक वा धर्म विरोधी ठरवण्याच्या भानगडीत पडु नका . 




विवेकानंदांच्या विचार सागरातील… संशोधित ओंजळ भर पाण्यात -  काही वैज्ञानिक  मोतिबिंबे अवश्य मिळतील . पण ओंजळितले पाणि ओघळले कि केवळ प्रतिबिंब हाती उरेल . विवेकानंदांच्या समग्र विचाराचे आकलन निश्चित पणे आस्तिक आहे - वैदिक परंपरेचे अभिमानी आहे .

कलकत्त्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिराचे पुजारी रामकृष्ण , त्यांचे शिष्य विवेकानंद - त्यांचे साक्षात्कार - वेदप्रेम, समग्र लेखन हे सारे लक्षात घेतले तर विवेकानंद बुद्धिवादी नव्हते हे सहजच  लक्षात येते.  

विवेकानंद कृत हिंदु पुनरुत्थान आणि   … फुले, आगरकर कृत हिंदु समाजाचे  प्रबोधन ( ) यात प्रचंड अंतर आहे . विवेकानंद आणि आगरकर  हे एका नावेचे प्रवासी नाहित.  … त्यांचे अंतिम साध्य एक असले तरीहि …. 
जेंव्हा अशक्यप्राय अंतिम ( हेतू ) साध्य मानले जाते तेंव्हा - साधनच महत्वाचे ठरते. 


बुद्धीवाद्याला परंपरेचे प्रेम नसते. 
परंपरेचे प्रेम जागवून बुद्धिवाद जागृत  करता येत नाहि.  


विवेकानंदाना साक्षात्कार होत असत . येशु , राम आणि दुर्गेचा साक्षात्कार झाल्याचे त्यांनी स्वत:च लिहिले आहे.  वेदस्तुती आणि वेदप्रामाण्य - वेदांकडे पुन्हा चला अशा सुस्पष्ट गर्जना विवेकानंदानि केलेल्या आहेत . हे सर्व  धर्माचे पुनरुत्थान आहे . यात धर्माचा कालसुसंगत - प्रागतिक अर्थ काढून धर्माची नव्याने उभारणी केली जाते . आधी रुढ नसलेला -  नवा काल सुसंगत  अर्थ विवेकानंदाना धर्मातुनच काढायचा आहे .दयानंद सरस्वतींनि  हेच केले होते.   धर्मवीध्वंसन विवेकानंदाना अपेक्षित नाही . त्यांच्यावर ते थोपवू हि नये . ती लबाडी ठरेल .  


संघाच्या सामजिक समरसता मंचाच्या स्टेज मागचे फ़ोटो 

आपल्या हिंदूची महत्वाची अडचण हि कि आपण अजूनही पोथिनिष्ठ अवतार वादि आहोत.संभवामि युगे युगे - देवाने  महापुरुष रूपाने जन्म घेतला तो आमच्याच भल्यासाठी अशी फालतू श्रद्धा आपण बाळगून आहोत . महान पुरुष असंख्य  घोडचुका करत असतात - ते कालबाह्य होत असतात . त्यांच्याविषयी पुर्ण आदर ठेवून…  त्यांचे सर्व विचार पूर्णपणे नाकारता येतात हे आपल्या गावीही नसते …अवतार वादि  हिंदुच्या अनेक संघटना आहेत - संघ असो वा बामसेफ , सनातन वा ब्रिगेड  गट , कम्युनिस्ट वा समाजवादी  -- समग्र भारतीय परंपरेतील समग्र महापुरुषांवर आपला हक्क सांगतात .

संघ आणि त्याचा परिवार उघडपणेच परंपरेचे अभिमानी आहेत . त्यांनी   समरसता वादि फ़ोटोंचे संम्मेलन करणे नैसर्गिक आहे. प्रामाणिकहि आहे. 

पण क्रांतीवादी कम्युनिस्ट , बुद्धिवादी नास्तिक , बंडखोर विद्रोही या सार्यांनी महापुरुषांच्या फ़ोटोंचा जत्था (विविध प्रकारच्या) पूजेसाठी वापरणे हि मात्र विनोदी हिंदूत्वाचि कमाल झाली !



नव पुरोगामी / नव नास्तिकांचि दैवते 
    
गंमत म्हणजे हे अवतार आमचे आहेत - आमच्या विचारांचे आहेत म्हणून तथाकथित पुरो-प्रतिगामी भांडत आहेत. आणि विरुद्ध बाजूवर अपहरणाचा आरोप करत आहेत .

खरे तर दोन्ही पक्षाना प्रत्येक जातीचा रिप्रेसेंटेटिव्ह महापुरुष पूजा करायला हवा आहे. त्याने भाबड्या पण जातीय हिंदूची गर्दी जमवता येते असा त्यांचा अनुभव आहे .  

                        


सुधारणा हे अल्पमत - आणि रूढी हे बहुमत


हा साधा विचार निदान नास्तिक लोकांनी तरी समजून घेतला पाहिजे . पुरोगामी परंपरा हा वदतोव्याघात आहे हे तरी लक्षात नको का घ्यायला ? भारतातले बहुसंख्य राजे महाराजे संत आणि धर्मपुरुष ज्या मार्गाचे पालन करत आले त्याला रूढी म्हणतात . आणि सुधारणावाद्यांची परंपरा मेन स्ट्रीम मध्ये अस्तित्वात असू शकत नाही .

मेनस्ट्रिम - मुख्य परंपरेला  सुधारणा नाही….  तर रूढी म्हणतात हे  लक्षात घ्यावे च  लागेल . 

भारतीय लोकांच्या आर्ग्युमेंटेटीव्ह बुद्धीचा आपल्याकडे जरा जास्त  गवगवा करण्यात आलेला आहे . दार्शनिक तत्वचर्चा आणि थापेबाजी यात काही फारसे अंतर नाही . तथाकथित पुरो आणि प्रतिगामी यांच्या तर्क बुद्धीत सुद्धा काही अंतर नाही .

विवेकानंद नास्तिक , शिवाजी महाराज पुरोगामी , तुकाराम विद्रोही  - (कधीकधी )ज्ञानेश्वर - नामदेव - सावता माळी तर हक्काचे प्रबोधनकार , मुस्लिम शासक धर्मनिरपेक्ष , ब्रीटिशांचे राज्य देवाचे ,  यादव म्हणजे तर सांस्कृतिक मापदंड , चालुक्य , शालिवाहन , चंद्रगुप्त , अशोक हा सारा भारताचा सुवर्णकाळ…. ( मधली वेदाची काही शतके सोडली तर)  पुन्हा सिंधु संस्कृती अस्सल पुरोगामी , वेदातले प्रक्षिप्त पुरुषसुक्त काढले कि कि वेद उपनिषीद सुद्धा खासा पुरोगामी बनून जाते ,शैव तांत्रिक मांत्रिक - परंपरेवर आमचे कोम्रेड शरद पाटिल  दिलसे फिदा आहेत. बुद्धिवादी चार्वाक म्हणजे लोकायत म्हणजे बहुजन बहुसंख्येचे तत्वज्ञान -  असेहि काही  पुरोगामी  म्हणत आहेत …. इतका बुद्धिवाद जर देशात सहस्रो वर्ष रसरसून वाहत  होता तर वेदात विमाने असायला हरकत काय आहे ?  काय फालतूपणा लावला आहे ?

ज्या देशातले  बहुसंख्य राज्यकर्ते - बहुसंख्य संत आणि बहुसंख्य समाज घटक  पुरोगामी असतात त्यात सुधारणा चळवळ चालवायची गरज काय उरते ?  

-----------------------------------------------------------------------------------------------------------
आज वर राज्य केलेल्या ४७ भारतीय राजवटिचि यादी खालील लिंक वर दिली आहे . त्यातल्या ९०% पेक्षा जास्त राजवटिंना पुरोगामित्वाचे सर्टिफ़िकेट प्राप्त झालेले आहे . त्यासाठी शेकडो रसभरित पुस्तके लिहिली गेली आहेत…काहीतरी चुकतंय का ? 

http://en.wikipedia.org/wiki/List_of_Indian_monarchs
-----------------------------------------------------------------------------------------------------------


१७९० - १८३५ - २०१५ 

भारतामध्ये मेकोलेप्रणित शिक्षण पद्धतीमुळे पुरोगामित्व , विज्ञान निष्ठा आदी गोष्टींची तोंडळख झाली …. त्या आधी हा विचार भारतात रूढ नव्हता …फार कशाला १७९० पूर्वी सार्या जगात पुरोगामित्व नव्हते

स्वातंत्र्य - समता - बंधुता  

(व्यक्तिचे ) स्वातंत्र्य , (संधीची) समानता ,( मानवी) बंधुभाव हि त्रयी सामाजिक अनुशासनाचे प्रमुख सूत्र म्हणून फ्रेंच राज्यक्रांति नंतर जगाने स्वीकारली . १७९० साली जगात हा विचार प्रथम प्रकट होऊ लागला . पुढे १८३५ साली इंग्रजांनि शिक्षण कायद्याच्या रूपाने भारतीयांना हे बोधामृत पाजले . मेकोलेच्या गोठ्यातल्या वाघिणीचे दुध भारतीयांनी प्यायले तेच मुळी १८३५ साला नंतर ……… या आधी भारतीय स्वत:च्या भारतीय बांधवाना गुलाम करत होते किंवा परकीयांचे गुलाम होत होते . टिळक , गांधी , आगरकर , सावरकर , बोस , नेहरू , भगत सिंग आणि डॉ आंबेडकर हे सारे आधुनिक शिक्षणाचे परिणाम आहेत. भारताच्या (लोकशाही ) राजकीय , सामाजिक , आर्थिक स्वातंत्र्याचि सुरवातच मुळात १८३५ नंतर होते. 

आज ज्या मुल्यांना आपण पुरोगामित्व म्हणतो त्याचा जन्मच १७९० सालचा आहे ……

कॉम्रेड शरद पाट्लांना स्त्रीसत्ताक , सामंत शाही विरोधि, वैदिक धर्म संहारक शिव शंभु चरित्र सोळाव्या शतकात रंगवले आहे. स्वातंत्र्य , समता , बंधुता अशी फ्रेंच राज्य क्रांतितलि सर्व मुल्ये १०० वर्ष आधी भारतात शोधली आहेत . तुकाराम महाराज विद्रोही होते असा पुरोगाम्यांचा लाडका सिद्धांत आहे . मग विट्ठल भक्ती म्हणजे नास्तिकता असे म्हणायला काय हरकत आहे ? विठ्ठलाला वेद विरोधी ठरवले कि मग काम भागते .

पण हा प्रमाद केवळ शिवरायांबाबत केला गेला आहे काय ? नाही . भारतातले सर्व संत , महंत राजे , महाराजे यांच्या पुरोगामी घर वापसीचे  संशोधन हजारो पृष्ठे , शेकडो ग्रंथ व्यापून दशांगुळे वर उरले आहे. ब्राम्ह्णाशि झालेले एखाद दुसरे क्वचित भांडण  हा पुरोगामित्वाचा क्रायटेरिया ठरत असेल तर धन्य आहे. बहुतेक इतिहास पुरुषांच्या पुरोगामित्वाचे पुरावे यापलीकडे नाहित.

हे संशोधन नाही . लबाडी आहे. हास्यास्पद आहे.

२०१५ सालचे आधुनिक विचार १८३५ साली भारतात येऊ लागले , पुरोगामित्वाचा जन्म १७९० च्या फ्रेंच राज्यक्रांतित आहे …। त्याआधी ते विचार - जवळ जवळ तितक्याच शुद्ध स्वरूपात होते असे मानणे - मांडणे आणि त्यासाठी भांडणे हा शुद्ध मूर्खपणा आहे . इतिहास पुरुषांवर हि तो अन्याय आहे .


चांदोबा - चंपकचि पुरोगामी कूटनीती 

शत्रूला संपवायला शत्रूची स्ट्रेटिजि वापरावी लागते हे तात्पर्य चांदोबाच्या कथेत शोभते . वास्तवात नाही . व्यक्ती पुजक आणि अवतारवादि हिंदुचे प्रबोधन करायला अवतार मुखातील (सिलेक्टिव्ह ) शब्दाचा तलवारी सारखा वापर चालला आहे . परंपरेचे  काही बिघडले नाही.प्रबोधनाची  तलवार मात्र बोथट झाली आहे. भारतातल्या उज्ज्वल   थापाडेपणाचे सनातनी  तत्वज्ञान  - नव  नास्तिक / पुरोगाम्यांनी आत्मसात केले आहे .  स्वत:चे उपनयन बदलून टाकले आहे . आता शेंडी राखणे हा केवळ उपचार आहे . मेंदूची मुंज जुनीच आहे. 

सनातनी म्हणजे रूढीवादी विचाराशी लढायला स्वत:च रूढीवादी होणे योग्य आहे काय ? भारतातली बहुसंख्य परंपरा बहुसंख्य काळ पुरोगामी राहिली असेल तर सुधारणेचे प्रयोजन काय ? ह्या अवतार वादातून हिंदुचे मेंदु मुक्त करणे हे त्यांचे प्रबोधन आहे . अवतारांची नास्तिक घरवापसी बुद्धीवादाला कायमचा सासुरवास ठरत आहे.


बुद्धिवादाचा प्राथमिक नियम 


समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य, विज्ञान निष्ठा , बुद्धिवाद  याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. जे व्यक्तीच्या आयुष्याबात खरे आहे तेच सामाजिक स्थित्यंतरा बाबतही खरे आहे. 

मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. 






बुद्धिवादाची भावनिक प्रेरणा ? 

पुर्वजाना पुरोगामी ठरवले तर त्यापासून प्रेरणा घेऊन वंशज वैज्ञानिक निघतील हि भाबडी आशा आहे.  नव्हे हा सरळ सरळ वंशवाद आहे . जातिवाद - धर्मांधता आहे. ह्या चांदोबा चंपक चाकण्य नीतीसाठी पुरोगामी खोटे बोलायला तयार आहेत . थापा मारायला तयार आहेत . असल्या पुरोगामी परंपरातुन प्रेरणा घेण्याने बुद्धिवाद तर शिकता येत नाहीच - फकस्त थापाड्या परंपरा घट्ट होत जातात . 






थॉट क्राईम

लोकशाहीच्या विरोधकांचा मताधिकार काढून घ्या
स्वातंत्र्य विरोधकांना तुरुंगात डांबा
धर्मांधते विरुद्ध लढण्यासाठी नवा धर्म काढा
जातीयवादी जातीना धडा शिकवा
समतेच्या विरोधकाना गुलाम बनवा
हिंसेच्या समर्थकांची मुंडकी उडवा
असत्याशी सामना असत्यानेच करता येतो

पुरोगाम्यांनाहि परंपरेचा वारसा प्रिय आहे भावा

.
.................................................. 

४ टिप्पण्या:

  1. आज वर राज्य केलेल्या ४७ भारतीय राजवटिचि यादी खालील लिंक वर दिली आहे . त्यातल्या ९०% पेक्षा जास्त राजवटिंना पुरोगामित्वाचे सर्टिफ़िकेट प्राप्त झालेले आहे . त्यासाठी शेकडो रसभरित पुस्तके लिहिली गेली आहेत…काहीतरी चुकतंय का ?

    http://en.wikipedia.org/wiki/List_of_Indian_monarchs

    उत्तर द्याहटवा
  2. काही तरी ? सगळेच चुकते आहे. कोणत्याही मोठ्या माणसाला समाजापुढे आदर्श म्हणून उभा करताना त्याला दैवी दाखवणे हे पूर्वी च्या काळात ठीक होते. विचार इकडून तिकडे जाण्यासाठी महिनो न महिने लागत होते. अश्या वेळी वलयांकित व्यक्तिमत्व लवकर स्वीकारले जात होते. पण आता च्या काळात देखिल व्यक्ती पूजन व पोथीनिष्ठा सोडून काही दिसत नाही.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *