विज्ञान आणि तर्कशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विज्ञान आणि तर्कशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२ मे, २०१४

ॲरिस्टोटल च्या चश्म्यातुन - तर्कदोष (fallacy)

  


ॲरिस्टोटल च्या चश्म्यातुन - तर्कदोष (fallacy)


इग्लंड  मधल्या एका रेल्वे गाडीत दोन प्रवासी सामोरा समोर बसले होते . पेपर वाचत होते. दोघे स्कोटिश होते . पहिल्या पानावर एका तरुणीच्या खून आणि बलात्काराची बातमी होती. बातमीचा मथळा पाहताच दोन्ही स्कोटिशान्नि नाके मुरडली. असले रानटी  काम कोणताच स्कोटिश करू शकत नाही  हे त्यांच्या मनात क्षणात चमकून गेले . बातमी पुढे वाचतात… तो हि घटना स्कोटलन्ड मध्येच घडलेली असते.  दोन्ही स्कोटिशाना आश्चर्याचा धक्का बसतो. पुढे वाचतात तर तो खुनी आणि बलात्कारी माणुस चक्क एक स्कॉटिश निघतो  ! दोघे स्कोटिश मान हलवत म्हणतात …. मग तो " खरा " स्कोटिश नसणार !


अशा प्रकारे विचार करण्याला तर्कदोष  - फेलसि असे म्हणतात. इथे आपले स्कोटीश जातभाई वाईट कृत्य करूच शकत नाहीत असे गृहीत धरलेले आहे.  पण नवा अनुभव आल्यानंतर जुने निष्कर्ष बदलले पाहिजेत . पण तसे न करता … स्कोटीश असण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे . स्कोटीश च्या आधी  "खरा"  हा शब्द जोडून …. आपल्या निष्कर्षात बसतील तेव्हढेच स्कोटीश " खरे " म्हणायचे असतात ! हा तर्कदोष "खरा"  हिंदू दहशतवादी नसतो किंवा "खरा" मुसलमान शांतता प्रिय असतो असाही वापरता येईल . इथे जो शांतात प्रिय नसेल त्याला "खोटा" म्हटले कि आपला तर्कदुष्ट युक्तीवाद पूर्ण होतो.  






फेलसि - तर्कदोषांचे वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न ॲरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४–३२२) केला. हे वर्गीकरण अजूनही बरेचसे रूढ आहे व तर्कदोषांचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात येणारी बरीचशी परिभाषाही ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणावर आधारलेली  आहे.

ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरू होता. प्रस्तुत लेखात ॲरिस्टॉटल ने केलेले तेरा तर्कदोष पहायचे आहेत . इथे हे समजून घ्यायला हवे कि जगभरातल्या सर्व माणसात हे तर्कदोष कमी अधिक प्रमाणात आढळतात . मानवाची उत्क्रांती होत असताना प्रतिकूल नैसर्गिक स्थितीत टिकून राहताना फार विचार करत बसायला मानवी मेदुकडे वेळच नव्हता . फटकन निष्कर्ष काढण्यासाठी तर्कदोष उपयुक्त आहे त्यामुळे उत्क्रांतीत तो सिलेक्ट झाला आहे पण योग्य निष्कर्ष काढण्यासाठी या नैसर्गिक तर्क दोषातून मुक्त व्हावे लागते . त्यासाठी लोजिकल - तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायला मेदुला शिकवायला लागते .
प्रस्तुत लेखात तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्यासाठी कोणते तर्कदोष (फेलसि ) टाळायला हव्या ? त्या बद्दल ॲरिस्टॉटल चे मत पाहू .

ॲरिस्टॉटल ने चुकीच्या भाषेमुळे निर्माण होणारे (भाषिक ) आणि चुकीच्या विचार पद्धतीमुळे निर्माण होणारे तर्कदोष म्हणजे आशयिक अशी विभागणी केलेली आहे.






भाषिक तर्कदोष :


१) शब्दच्छल : 

एका शब्दाचे अनेक अर्थ भाषेत असतात . शब्दाच्या मुळ अर्थाचा छळ करून वेगळाच अर्थ  युक्तिवादात वापरला जातो . कायद्याच्या कचाट्यातुन सुटण्यासाठी सुद्धा हा तर्कदोष मुद्दाम वापरला जातो . नरो वा  ? कुंजरो वा ??  अश्वत्थामा मेला आहे असे धर्मराज सांगतो . त्यावेळी तो अश्वत्थामा या हत्तीचा उल्लेख करत असतो . पण त्यावरून अश्वत्थामा ह्या द्रोणाचार्यांच्या मुलाचा वध झाला आहे असे सुचित होते .

नरेंद्र मोदींना तुम्ही हिंदू राष्ट्रवादी आहात काय ? असा प्रश्न विचारला गेला होता . त्यावर मोदिनी मी हिंदू आहे आणि राष्ट्रवादी आहे असे उत्तर दिले होते . त्यामुळे त्यांचे समर्थक हि खुश होणार  आणि कुणि मोदिना त्यावर विरोधही करू शकत नाही . कारण हिंदू असणे पाप नाही . राष्ट्रवादी असणे तर त्याहून नाही . मुळातला प्रश्न तुम्हाला हिंदू धर्माचे राज्य आणायचे आहे काय ? घटना बदलायची आहे काय ?  सेक्युलर घटना मोडुन धार्मिक हिंदुराष्ट्र हवे आहे का ? असा आहे . पण मोदिनी शब्दाची फोड करून शब्दच्छल या तर्कदोषाचा युधिष्ठीर  - धर्मराजाप्रमाणे वापर केलेला आहे !

२) वाक्य छळ : 


हा तर्कदोष युक्तिवादात एक वाक्य दोन अर्थांनी घेतल्यामुळे घडतो. उदा., हे वाक्य पहा :

आई आणि ती मुलगी खेळत होत्या  - मेंदी लावलेल्या हाताने .

नेमकी मेंदी कोणि लावली आहे ? आईने ? मुलीने ? कि दोघांनी ? काहीच अर्थबोध होत नाही . प्रस्तुत उदाहरण जरी साधारण वाटले तरी वाक्य छळ हा तर्कदोष उजून गंभिर वळण घेऊ शकतो  . जसे की : -

तू    माझी बायको   मी    तुझी बायको    सिनेमाला जाऊ ! या वाक्यात योग्य ठिकाणी स्वल्पविराम दिले नाहीत तर गंभिर परिस्थिती उद्भवू शकते .






३ / ४ )  गुणाकार आणि भागाकार (समाहार आणि विभाजन ) :   


या  एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . फारच कमी निरिक्षणातुन निष्कर्ष काढण्याची सवय सर्व प्राणिमात्राना आहे . माणुस हि त्याला अपवाद नाही .  वाद विवादात हा तर्कदोष खूप वेळा वापरला जातो .

उदाहरणार्थ : पुणे हे कंजूष  माणसांचे गाव आहे . स्वत:ला आलेल्या थोड्याश्या अनुभवांना येथे कल्पनेने गुणले आहे आणि एका अक्ख्या शहराविषयी विधान केलेले आहे .

तसा कल्पनेतला भागाकारही (विभाजन ) चुकीच्या निष्कर्षांना जन्म देतो . उदाहरणार्थ : बिहार हे गरीब राज्य आहे म्हणून सर्व बिहारी गरीब आहेत म्हणुन लालू हा एक गरीब मनुष्य आहे . सर धोपटिकरण किंवा जनरलायझेशन करायच्या मानवी प्रवृत्तीमुळे हा तर्कदोष निर्माण होतो .



५) आघात

वाक्य उच्चारताना किंवा वाचताना चुकीच्या शब्दावर जोर दिला तर हा तर्कदोष निर्माण होतो .
"तो काल संध्याकाळि येणार होता . " या वाक्यातल्या  वेगवेगळ्या  शब्दावर जोर देऊन अनेक अर्थ काढता येतात . उदा : -

"तो काल संध्याकाळि येणार होता . " - तू का आलास ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . "  - आज का आला ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . "  - सकाळी का आला ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . "  - आलाच नाही !

चुकीच्या शब्दावर जोर दिला कि तर्कदोष तयार होतो . 

 तू शेजार्या विरुद्ध खोटी "साक्ष" देऊ नको . इथे साक्ष ऐवजी " शेजार्याविरुद्ध " या शब्दावर जास्त जोर दिला तर शेजारी सोडुन इतर लोकाविरुद्ध खोटी साक्ष द्यायला हरकत नाही . असा चुकीचा अर्थ निघू शकतो.





६) व्युत्पत्तीदोष : 


ज्या अर्थाने शब्द बनला त्या अर्थाने वापरला पाहिजे . शब्दाआधी अ प्रत्यय लावला तर विरुद्धार्थी शब्द बनतो . अ + स्वीकार = स्वीकार न करणे . उदाहरणार्थ अमुल्य चा अर्थ आहे ज्याचे मुल्य (किंमत ) करता येत नाही असे  . पण तुमचे मत अ + मुल्य (फुकट ) आहे असे त्याचा अर्थ लावला तर तो तर्कदोष ठरेल .






आशयिक तर्कदोष :


१) गृहीत प्रश्न दोष : 


तू बायकोला मारणे सोडलेस का ? तू दारू पिणे सोडलेस का ? भाजपा लोकशाही मानणार  का ? या प्रश्नात एक तर्कदोष आहे . समोरचा माणुस दारू पितो, बायकोला मारतो, लोकशाही धिक्कारतो  हे आधीच  गृहीत धरण्यात आलेले आहे . पहिले गृहीत सिद्ध न करताच हा प्रश्न विचारणे तर्कदोष ठरते  .


२) विवाद अज्ञान तर्कदोष :

हा असंबद्ध युक्तिवाद करणार्यांचा तर्कदोष आहे .   वाद विवाद करण्याचे सामन्य नियम माहित नसणारी माणसे हा तर्कदोष वारंवार करतात. आपण युक्तीने मुळ प्रश्नाला बगल दिली ! असे त्याना वाटत असते . वस्तुत: हा तर्कदोष आहे . हि युक्ती तर्कशास्त्राच्या अज्ञानातून सुचलेली असते . याचे ४ उपभाग आहेत




२अ ) व्यक्तीयुक्ती  / हेत्वारोप :  


यात विरोधकाच्या मताचे खंडन केले जात नाही . सरळ हेतूवर शंका घेतली जाते . उदाहरणार्थ आमच्या विरुद्ध लिहिण्यासाठी तुला पैसे मिळतात असे म्हणणे . किंवा तुझ्या मनातला सुप्त जातिवाद हे बोलतो आहे …. असे म्हणुन विरोधकाच्या व्यक्तिमत्वावर / हेतूवर / चारित्र्यावर शितोडे उडवले जातात . मग त्याच्या मतांचे खंडन करण्याची गरजच उरत नाही .  हा तर्कदोष सर्व राजकारण्यांकडून वापरला जातो . मोदींच्या जुन्या विवाहावर टिका करणे किंवा सोनिया गांधींच्या परदेशी मुळाचा उल्लेख  करून त्यांच्या विचारांचे खंडन टाळणे हा तर्कदोष व्यक्तीयुक्ती / हेत्वारोप म्हणुन गणला जाइल .


२ब ) भीती युक्ती : 


आपले मत पुराव्याच्या आधारावर सिद्ध करायचे नाही . ताकदीची  किंवा नुकसानीची भीती वारून युक्तिवाद टाळणे याला भीती युक्तीचा  तर्कदोष म्हणता येईल . समान नागरी कायदा करू नका . मुस्लिम  चिडतील . दंगल होईल . हा  तर्कदोष आहे . अंधश्रद्धा विरोधी कायद्याने हिंदू चिडतील म्हणुन तो करू नका हा ही तर्कदोष आहे . हि भितीयुक्ती हा भारतीय राजकारणाचा पाया बनला आहे . भीती दाखवली कि युक्तिवाद संपला आपण जिंकलो असे वाटणे हा ॲरिस्टोटल ने तर्कदोष ठरवला आहे .








२क ) लोकभावना युक्ती : 


आपला मुद्दा युक्तिवादाने सिद्ध न करता लोकांच्या भावनेचा हवाला देण्यात येतो . जगातले इतके कोट्यावधि लोक हजारो वर्षे धर्मावर श्रद्धा ठेवतात . मग धर्म चूक कसा असेल ? हा तर्कदोष आहे . नेक लोक अनेक वर्षे मुर्खपणाहि करू शकतात .


२ड ) आदर युक्ती : 

एखाद्या महान माणसाचा हवाला देऊन स्वत:चे मत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो . उदाहरणार्थ : गांधीजी धार्मिक होते. महान माणसाची सर्वच मते योग्यच  असतील असे नाही .  पैगंबराने अनेक विवाह केले . ज्ञानेश्वरांनी चातुर्वण्यावर आघात केले नाहीत . तुकोबा वैष्णव होते .  शिवाजी महाराजांनी आठ लग्ने  केली होती . आंबेडकरांचा फाळणीला पाठिंबा होता  .  समजा  हे सर्व खरे आहे . पण केवळ ह्या दाखल्यांवरून . आजचे युक्तिवाद करता येत नाहित.  अगदी आजच्या काळातल्या इस्रोच्या वैद्न्यानिकांनी बालाजीला साकडे घातले यावरून धर्माची आवश्यकता सिद्ध होत नाही . महान आणि आदरणीय व्यक्तीमत्वांचे हवाले देत युक्तिवाद करणे हि युक्ती समोरच्याला गप्प करायला ठीक असली तरी  तो तर्कदोष आहे. पण व्यक्तीपुजेने बद्ध समाजात हा तर्कदोष सहजच चालून जातो .


३) चक्रविचार : 

यात अ ने ब सिद्ध केले जाते आणि मग पुन्हा   ब ने अ सिद्ध केले जाते . येशु प्रेषित आहे कारण बायबलात तसे लिहिले आहे आणि बायबल दैवी ग्रंथ आहे कारण येशु देव तसे म्हणतो . खरे पाहता या दोन्ही गोष्टी स्वतंत्र पणे सिद्ध केल्या पाहिजेत.  चक्रविचार हा तर्कदोष सर्वच इझंम वाल्या मंडळींकडून थोडाबहुत वापरला जातो . वेद हि ईश्वरी वाणी अपौरुषेय आहे कारण वेदातच  तसे म्हटले आहे किंवा आंबेडकरांनी म्हटले कि जेव्हढा बुद्धधर्म विज्ञान निष्ठ असेल तोच खरा बुद्धधर्म ! हि दोन्ही आर्ग्युमेण्ट यातच मोडतात .







४) छद्म कारण दोष : 


यात वेगळ्याच कारणाचे खण्डन करून भलताच परिणाम चूक ठरवला जातो . पक्षि उडतात मग गुरुत्वाकर्षण कसे काय अस्तित्वात असू शकेल  ?  वास्तविक पाहता पक्षि किंवा विमाने उड्ण्याचा आणि गुरुत्वाकर्ष्णाच्या सिद्धांताचा काहीच संबध नाही .




 राजचे आडनाव ठाकरे आहे मग तो हिंदुत्व वादिच  असणार हा हि तर्क दोषच.  कारण आडनावाचा आणि विचारसरणिचा काहीच संबध नसतो !









५) उपाधी तर्कदोष: 


 याचं अॅरिस्टॉटलने दिलेलं उदाहरण सांगतो. हा कुत्रा बाप आहे, हा कुत्रा तुझा आहे. म्हणून हा कुत्रा तुझा बाप आहे. हे विधान उघडच तर्कसंगत नाही.





६) सामान्य-विशेष-संभ्रम : 


 सामान्य नियम जेव्हा आपण विशिष्ट वस्तुंना किंवा घटनांना उद्देशून लावतो, तेव्हा त्याचं हे उपयोजन काही अटींनी मर्यादित झालेलं असतं असं आपण मानतो. पण अनेकदा आपण या अटी स्पष्टपणे नमूद करत नाही. उदाहरणार्थ, ‘प्रत्येक माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो,’ हे सामान्य तत्त्व जर आपण घेतलं, तर माणसाला वेड लागलेलं नाही, तो शुद्धीवर आहे इत्यादी अध्याहृत अटी त्याचं उपयोजन मर्यादित करतात. अशा सामान्य तत्त्वाच्या उपयोजनावर मर्यादा घालणार्या अटी लक्षात न घेता, जर ते तत्त्व एका विशिष्ट वस्तुला लावलं, तर तो सामान्य-विशेष-संभ्रम तर्कदोष होय. उदाहरणार्थ, दारूच्या धुंदीत असलेल्या माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो असा निष्कर्ष मी काढला, तर हा तर्कदोष घडेल.







आता आपण पुढे नव्याने वापरात आलेले तर्कदोष पाहू. आपल्याला हवी तेवढी माहिती गोळा करायची नको त्या माहितीकडे दुर्लक्ष करायचं. मग आपोआपच आपल्याला हवे ते निष्कर्ष निघतात. फोर्टमध्ये राहणार्या माणसांची स्थानिक स्थिती पाहून सगळी मुंबई श्रीमंत आहे असा निष्कर्ष काढणं यास चेरी पिकिंग फेलसी असं नाव आहे.

वदतोव्याघात हा एक अजून   तर्क दोष . यात आपण आपले म्हणने आपणच खोडून काढत असतो . उदाहरणार्थ ती म्हातारी बाई फार तरुणपणिच मरून गेली किंवा ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या . म्हातारी बाई तरुणपणिच मरू शकत नाही कारण ती म्हातारी आहे असे आपण आधीच म्हटले आहे . ब्राह्मण हि एक जात आहे . आणि जर भुतकाळात इतिहासात जाती नसलेली व्यवस्था अस्तित्वात असेल तर जाती निर्माण करायला … ब्राह्मण हि जात कोठून उत्पन्न झाली  ?


सगळ्यात शेवटचं म्हणजे ः स्ट्रो मेन फेलसी ः यामध्ये दुसर्याचं मुख्य म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आणि निरर्थक लहान मुद्यावर वाद घालत वेळ काढायचा याला स्ट्रो मेन फेलसी असं म्हणतात. स्ट्रो मेन म्हणजे बुजगावणं. शत्रुच्या सैन्यावर हल्ला न करता शत्रुच्या बुजगावण्यावर हल्ला करायचा आणि मग विजयाचा डंका पिटायचा… प्रस्तुत लेखातल्या मुख्य विषयाकडे दुर्लक्ष करून लहानसहान नजरचुकीवर हल्ला करून बुजगावणं मारल्याचा आनंद व्यक्त करता येईलच की! त्यालाच म्हणायचं स्ट्रो मेन फेलसी!







(संदर्भ स्रोत : मराठि विश्वकोश , तत्वज्ञान कोश , गुगल ! )

.

९ एप्रि, २०१४

आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ?

आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ? 

विज्ञानाच्या चष्म्यातून आयुर्वेद :






 

सर्वप्रथम आयुर्वेदाला साष्टांग दंडवत :

आयुर्वेदाविषयी माझ्या मनात कुतूहल आहे . चरक आणि सुश्रुत या महान संशोधक पूर्वजांविषयी अतिशय आदर आहे . पण विज्ञान सतत बदलत जाते . गेलिलिओ चे भौतीकशास्त्र न्युटन ने खोडून काढले म्हणुन गेलिलिओ लहान ठरत नाही . … कि न्युटन महान ठरत नाही . …. हाच न्याय चरक , सुश्रुत आणि आजच्या आधुनिक विद्न्यानालाहि लागू आहे .


आयुर्वेदात साइड इफेक्ट नाही . जुन्या दुखण्यांवर आयुर्वेद उपयुक्त आहे अशी चर्चा आणि कुजबुज सतत चालू असते. छोट्या मोठ्या मासिकातून , वर्तमान पत्रातून आयुर्वेदाची स्तुती करणारे भरपूर लिखाण चालू असते .  सांधे दुखीपासून , डायबिटिस पर्यंत आणि केन्सर पासून एडस पर्यंत अनेक रोगावर आयुर्वेदात उपचार आहेत असे सांगितले जाते . हे खरे आहे काय ? मग आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही ? प्रस्तुत लेखात आपण आयुर्वेदाची वेगवेगळ्या अंगाने चर्चा करायची आहे .


काय आहे आयुर्वेद ? 


मान्य ग्रंथानुसार आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. चरक आणि सुश्रुत या आचार्यांनी स्थापन केलेल्या विचारशाला यात महत्वाच्या आहेत . आणि प्राचीन काळी इतरही अनेक मान्यवरांनी यात भर टाकली आहे . पण आयुर्वेद हि केवळ उपचार पद्धती नाही . वात , पित्त आणि कफ हे तीन दोष संतुलित असले तर मनुष्य निरोगी राहतो आणि त्यांचे असंतुलन झाले तर रोग होतात असे आयुर्वेद मानतो . नाडी, मूत्र, मल , जिंव्हा , शब्द, स्पर्श , दृक, आकृती, या आठ गोष्टी बघून आयुर्वेदात निदान केले जाते. त्यास अष्टविध निदान पद्धती असे म्हणतात.
                    


सोप्पे शास्त्र 

आजचे आधुनिक वैद्यक शास्त्र शरीरातील केमिकल रेणूंची तपासणी करते , एक्स रे , सिटी स्केन , मायक्रोस्कोप खाली रक्त परिक्षा , डिएनए परिक्षा यापैकी कशाचाही भानगडीत आयुर्वेद पडत नाही . आयुर्वेदाच्या कोणत्याहि ग्रंथात कोणत्याहि आधुनिक टेस्ट चा उल्लेख नाही . पण निव्वळ नाडिपरिक्षेतुन इसीजी पेक्षा अधिक माहिती वैद्याला कळते असे दावे मात्र आज आहेत . तीन दोष आठ निदान पद्धती खेळ खल्लास . बरे आजच्या माणसाला होणारे बहुसंख्य रोग हे जीवाणू आणि विषाणू यांच्या संसर्गाने होत असतात . चरक आणि सुश्रुत संहितेत या बापड्या जीवांवर भाष्यच नाही !


सबब आयुर्वेद हि जीवनपद्धती आहे …. मुळात आयुर्वेदानुसार जीवन जगले कि रोग होतच नाहीत …त्यामुळे जीवाणू विशाणुच्या शेकडो प्रजातीन्बद्दल भाष्य करण्याची गरज आयुर्वेदाला वाटतच नाही ! त्यामुळे रोगनिदानाच्या कोणत्याहि आधुनिक पद्धती शिवाय आणि जीवाणूच्या इन्फेक्शन कडे संपूर्ण दुर्लक्ष करत आयुर्वेद भारतात दुमदुमत राहतो . त्याकाळी धर्म शास्त्रानुसार मानवी शरीराच्या डिसेक्शन ला परवानगी नव्हती . त्यामुळे आयुर्वेदाला मानवी शरीराची ( सखोल रचना ) एनाटोमि नीटपणे माहित नाही . जसे कि मेंदूचे निरनिराळे भाग आणि त्यांची कार्ये.... चरक आणि सुश्रुत संहितेत यावर भाष्यच नाही !


                                                    


आधुनिक परिभाषेचा द्वेष 


हे अणु , ते रेणू , हि टेस्ट ती पेस्ट , हे एक्स रे ते इसीजी हे सारे पाश्च्यात्य शब्दांचे बुडबुडे आहेत . आधुनीक विज्ञानाच्या चष्म्यातून आमच्या प्राचीन शास्त्राकडे पहाणे चूक . मात्र डायबेटीस आदी आधुनिक विकारांवर मात्र जालीम औषध आमच्याकडे आहे असे हे आयुर्वेदाचे तर्कशास्त्र आहे. बदलत्या जीवनपद्धतीनुसार रोग बदलत असतात . त्या आधुनिक रोगांवरचे जालीम इलाज सांगणार्या प्राचीन शास्त्राला आधुनिक परिभाषेचा मात्र राग करावा लागतो . 








इफ़ेक्ट आणि साईड इफ़ेक्ट 


खडूची पुड आणि लाकडाचा भूसा मेणात कुस्करून खाल्ला तर साइड इफेक्ट काही नाही . पण त्याचा इफ़ेक्टहि नाही हा मुद्दा आहे . आयुर्वेदाने केंन्सर बरा केल्याचे राणा भीमदेवी दावे मी वाचले आहेत . पिडलेली किडनी , बिघडलेले यकृत आणि गेलेली स्मृती परत आणणारी चूर्णे, भस्मे आणि आसवे आयुर्वेदापाशी आहेत असेही बिनबोभाट लिहिले जाते . आधुनिक वैद्यक शास्त्रातले एखादे औषध मान्य होण्यासाठी त्याला कठोर परिक्षेतुन - क्लिनिकल ट्रायल मधून पास व्हावे लागते . सुरवातीला औषधाचे प्रयोग प्राण्यांवर आणि मग माणसांवर केले जातात . रुग्ण आणि निरोगी अशा दोघान्वरही प्रयोग केले जातात . प्लासिबो इफ़ेक्ट ची शहानिश केली जाते . सर्व संख्याशास्त्रीय चाचण्यातुन पास झालेले औषधच मग रोग्याला दिले जाते . त्यावेळी त्या आधुनिक औषधाच्या सर्व इफ़ेक्ट आणि साइड इफ़ेक्ट ची माहिती डॉक्टरला असते . क्लिनिकल ट्रायल मध्ये ती माहिती डोक्युमेण्ट झालेली असते . आजवर आयुर्वेदाचे एकही राणा भीमदेवी औषध एकही क्लिनिकल ट्रायल पार करू शकलेले नाही . इच्छुकांनी क्लिनिकल ट्रायल बद्दल अधिक माहिती अवश्य करून घ्यावी . आणि आयुर्वेदातलि सर्व औषधे यात साफ नापास होतात हेही जाणुन घ्यावे . नापास होण्याच्या भीतीने क्लिनिकल ट्रायल साठि बहुतेक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधे उतरलीच नाहीत त्यामुळे त्यांचे दूरगामी साइड इफ़ेक्ट आपल्याला माहित नाहीत हे हि समजून घ्यावे .

http://en.wikipedia.org/wiki/Clinical_trial

http://www.openthemagazine.com/article/living/ayurveda-hoax-or-science





                               




आता थोडे अर्थशास्त्र 


एकेक गुणकारी औषधाचे पेटंट करोडो रुपयांना विकले जात असते . प्रोस्टेट केन्सरच्या एका औषधावर औषध कंपन्या डॉलरचा पाउस पाडत असतात . नवीन औषधांच्या संशोधनासाठी लाखो डॉलरचा अव्याहत खर्च चालू असतो . आयुर्वेदात एकजरी गुणकारी औषध असते तर या धंदेवाईक चालू कंपन्यांनी ते सोडले असते काय ? त्या औषधाचे स्वामित्व मिळवुन त्याचा जगभर व्यापार करण्याची संधी सोडुन द्यायला या कंपन्या मूर्ख आहेत काय ? आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात मेन्स्ट्रिम मध्ये  आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही ? 


दुर्बल मनाचे एकमेव आशास्थान : कोन्स्पिरसी थेअरी 

भाबड्या मनाचा काही गोश्टिवर ठाम विश्वास बसलेला असतो . पण हा विश्वास तर्कशास्त्राच्या आणि अर्थशास्त्राच्या सर्व पारड्यात गळून पडत असतो . बुद्धीला पटते पण मनाला पटत नाही मग …… आयुर्वेदाविरुद्ध या बहुराष्ट्रीय कंपन्यांची कारस्थाने सुरु आहेत …. आयुर्वेदाविरुद्ध अमेरिकेचा कट सुरु आहे अशा कोन्स्पिरसी थेअरिचा जन्म होत जातो . सशाविरुद्ध सिंह कट करत नसतात हे हि भाबड्या मनाला मग समाजात नाही


 . 
खरे दु:ख असे आहे :


मेडिकलच्या प्रवेश परिक्षेत अपघाताने दोन मार्क कमी पडले म्हणुन हुशार विद्यार्थी आयुर्वेद शाखेत प्रवेश करतो . मग स्वत:च्या व्यवसायाशी निष्ठा म्हणुन आयुष्यभर आयुर्वेदाची भलामण करत बसतो . जर दोन मार्क जास्त पडले असते तर ? आधुनिक वैद्यकाला प्रवेश मिळण्याएव्हढे मार्क मिळाले असते तर आयुर्वेदाला एडमिशन घेतली असती काय ? आणि तर आयुर्वेदाची भलामण केली असती काय ? 

मेडिकलची मिळणारी सीट नाकारून विश्वास म्हणुन आयुर्वेद स्वीकारलेले किती वैद्य मोजता येतील . कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात . जे त्या विद्यार्थांबाबत खरे आहे तेच भारतीय मानसिकतेबद्दल हि खरे आहे . वेदातल्या उडत्या तबकड्या , महाभारतातले एटम बोंब , रामायणातली विमाने आणि आयुर्वेदातले औषध ! पाश्चात्य सन्स्क्रुतिचा निषेध असो ! वेलीवर उंच लटकलेल्या द्राक्षाचां निषेध असो . 








प्लासिबू इफेक्ट 

पाद्र्याने हात लावला कि रोगी बरे होतात . मनाला बरे वाटले कि काही आजार बरे होतात . काही आजार मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती मुळे आपोआप बरे होतात . तसाच आयुर्वेदाच्या काही औषधांचा , काही लोकाना , काही वेळेला चांगला अनुभव येतो .
 हा व्यक्तिगत अनुभव म्हणजे विज्ञान नाही . 
क्लिनिकल ट्रायल् च्या संख्या शास्त्रीय मोजपट्टीवर पास झाले पाहिजे . दु:ख आयुर्वेदिक औषधे नापास होतात याचे नाही . दु:ख भारत सरकार नापास होते याचे आहे . एका अशास्त्रीय आणि परिणाम शून्य थेरपी चे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालये चालवली जातात . अनुदानात सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु राहते . अनेक हुशार विद्यार्थ्याना आयुर्वेदिक कालबाह्य काढे शिकत पाच वर्षे फुकट घालवावी लागतात . त्यातले अनेक पुढे जाउन आयुर्वेदाची प्रेक्टिस करतच नाहीत . त्याना ओ कि ठो न समजणारी आधुनिक औषधे देत बसतात . पेशण्ट च्या जीवाशी खेळतात . या सर्व लबाडिला भारत सरकार अनुदान देते . वैद्यांनी काढे , आसवे देत जीवन व्यतीत केले असते तर फक्त एका हुशार विद्यार्थ्याचे करिअर बरबाद होईल . त्यांच्या आंधळ्या एलोपेथि प्रेक्टिसने लाखो पेशनटचे हाल होतात. काही प्राणाला हि मुकतात . सर्व आयुर्वेदिक / होमिओपाथिक कोलेजांचे रुपांतर आधुनिक वैद्यकीय महाविद्यालयात केले पाहिजे . आणि त्या हुशार विद्यार्थ्याना आणि रुग्णाना न्याय मिळवुन दिला पाहिजे . आपल्या भारत देशात डॉक्टरांची संख्या कमी आहे . वैद्यकीय सुविधा कोमात आहेत . बालमृत्यू , कुपोषण , साथीचे रोग भारत देश पोखरत आहेत . आणी सरकारने आपला आर्थिक सट्टा आयुर्वेदाच्या प्लेसिबू इफ़ेक्ट वर लावला आहे . 




विज्ञान होणे सोप्पे नसते 

ज्योतिष पाहून आजाराचे निदान करण्याचे उल्लेख आयुर्वेदात आहेत . सापाचे विष उतरवायचे मंत्र आहेत. औषध सिद्ध करण्यासाठी पाच कुमारिकांनी त्याचे  पूजन करण्याचा विधी आहे .      मानवी भावनांचे आणि विचाराचे स्थान मेंदू नव्हे तर हृदय असे पारंपारिक आयुर्वेद मानतो . त्याला जीवाणू, विषाणू , डी  एन ए कश्शा  कश्शाचा आता पता नाही . तरी आयुर्वेदाला स्वत:स विज्ञान / शास्त्र म्हणवून घ्यायचे आहे . ठीक आहे. पण विज्ञान होणे सोप्पे नसते. 

आधुनिक वैद्यक शास्त्रावर कायद्याचा कडक वचक आहे . ती एक चांगली गोष्ट आहे . आयुर्वेदावर हे बंधन का नाही ? प्रथम औषध आणि त्याची परिणाम कारकता सिद्ध  करायची , पुन्हा ते औषध कसे बनवायचे ? याचा निर्बंध् सिद्ध करायचा … आणि जर पेशंटला त्याचा उपयोग झाला नाही - तोटा झाला   तर कोर्टाची पायरी चढायला मुक्तद्वार ठेवायचे . हे सर्व नियम आणि कायदे आधुनिक वैद्यक शास्त्राला आहेत . ते योग्य आहे पण भारत सरकारने या सर्व नियमातून आयुर्वेद आणि होमिओ पाथी ला सुट दिली आहे ! आयुर्वेदाच्या समर्थकाना   जर विज्ञान युगात यायचे असेल तर प्रथम हा कायद्याचा अंकुश   आमंत्रित केला पाहिजे . मंत्रित बुवाबाजीचे दिवस आता संपले . 

अमेरिकेतल्या कुठल्यातरी राज्यात आयुर्वेदाचे एखाद दुसरे  कोलेज आहे.  मोजकी आयुर्वेदिक औषधे क्लिनिकल  ट्रायल मध्ये बाजी मारू शकली आहेत . पण पुन्हा क्रोस ट्रायल घेतली तर त्यातलीच कित्येक हरतात . कधी संख्याशास्त्रीय माहितीतच  लोचा आढळून येतो .  अमेरिकन एफ डी  ए ने आयुर्वेदिक औषधे आमच्यातर्फे सिद्ध झालेली नाहीत असे वॉर्निंग लेटर हि प्रसिद्ध केलेले आहे.  ती पेशंट ने स्वत:च्या जवाबदारीवर वापरावीत। दुश्परिणामाना  आम्ही जवाबदार नाही   असेही म्हटले आहे . खरे पाहता आयुर्वेदात हेवी मेटल ची अनेक विषारी संयुगे वापरलि जातात . ती घातक आहेत आरोग्याला । दुसरीकडे आयुर्वेदाचा दावा आहे कि -   लिंबा पासून तुळशी पर्यंत सर्व औषधे सर्दी पासून केंसार पर्यंत सर्वांवर जालीम छावा   इलाज आहेत !  पुन्हा क्लिनिकल ट्रायल इल्ला . 



राणा भीमदेवी दावे : 


आयुर्वेदाची उपयुक्तता आधुनिक विज्ञानाने मान्य केली आहे असे दडपून खोटे लिहिले जाते . त्यासाठी अनेक उदाहरणे दिली जातात . सर्पगंधा नावाच्या एका आयुर्वेदिक औषधाचे उदाहरण चर्चेला घेऊ . 

सर्पगंधा हि वनस्पती उच्च रक्तदाबावर (हायपर टेन्शन वर ) चांगले औषध आहे . खरे आहे . आधुनिक औषधशास्त्र ती वापरते . या गोष्टीतून भलते अर्थ काढले जातात . 

आयुर्वेदात सर्प गन्धेचा उल्लेख आहे पण हायपर टेन्शनचा नाही . आयुर्वेदानुसार सर्प गन्धेचा हा श्लोक पहा :  

 सर्पगन्धा अति तिक्त  उष्णा रुक्ष कटु विपकिनी .
पित्तवृद्धिकारि रुच्या शूल प्रशमनी सरा.
कफ़वातहरा निद्रप्रदा ह्रुद्रव्सादिनी.
कामवसदीनी चैव हन्ति शूल ज्वर् क्रिमिन.
अनिद्रा भूत उन्माद अपस्मरं भ्रमं तथा.
अगनिमान्द्यं विषं रक्तवातधिक्यं व्यपोहति.

आयुर्वेदात सर्पगंधा पेन किलर - वेदनाशामक म्हणुन येते . पुन्हा तसेही नाही ! …  नेमके शास्त्र शुद्ध बोलेल तर तो आयुर्वेद कसला ? आयुर्वेदानुसार सर्प गंधा हे औषध चक्कर येणे , विषबाधा , मंद अग्नी  , पोटातले जंत , फेफरे येणे आणि वेडेपणावरहि  उपयुक्त आहे .  

आयुर्वेदानुसार सर्पगंधा रक्त दाबावारचे औषध  नाही .  हिंग पुस्तक आणि तलवारीचा अन्योन्य संबध … असा सगळा इल्ला कारभार आहे. परत बघा बघा रक्त दाबावरचे आयुर्वेदिक औषध सिद्ध झाले म्हणुन बोंब आहेच . हे सारे विवाद तर्कदुष्ट आहेत . फेलसी आहेत. 


विज्ञान सतत बदलत प्रगती करत जात असते . धर्माप्रमाणे हाजारो वर्षा पूर्वीच्या ग्रंथात अडकलेले नसते हे समजून घेतले पाहिजे .  वात पित्त कफावर आज्ज्या, काकू,  मावशा आणि पार्कातले आजोबा चर्चा करू शकतात म्हणुन त्याचे कुजबुज मार्केटिंग चालू राहते . कुजबुज मार्केटिंग म्हम्हणजे  विज्ञान नाही . विज्ञान होणे सोप्पे नसते . 

आधुनिक वैद्यकशास्त्राची पुस्तके दर वर्षी अपडेट होतात . हजारो  वर्षापूर्वी लिहिलेलि चरक आणि सुश्रुत संहिता आजही आयुर्वेदाचा मुख्य अभ्यासक्रम आहे . साध्या विंडोजचे  नवे व्हर्जन दर वर्षी येत असते .



जी  गोष्ट हजारो वर्ष बदलत नाही :


त्याला धर्म म्हणतात -  विज्ञान नाही. 


पुन्हा एकदा आयुर्वेदाला साष्टांग दंडवत :


आयुर्वेदाविषयी माझ्या मनात खरेच प्रेम  आहे . शिवाजी महाराजांचाही मी नितांत भक्त आहे म्हणून मी गाडी ऐवजी घोड्यावरून फिरावे काय ? 


चरक आणि सुश्रुत या महान संशोधक पूर्वजांविषयी  आदर आहे . पण विज्ञान सतत बदलत जाते . गेलिलिओ चे भौतीकाशास्त्र न्युटन ने खोडून काढले म्हणुन गेलिलिओ लहान ठरत नाही . … कि न्युटन महान ठरत नाही . 

मानवी बुद्धिमत्ता टप्प्या टप्प्याने आनि एकत्रितपणे काम करते . कालचे विज्ञान आज इतिहास ठरते . आयुर्वेद हा औषध शास्त्राचा महान इतिहास आहे . त्याचा जरूर अभ्यास व्हावा . 

इतिहासाच्या कला शाखेत आयुर्वेद शिकवला जावा . वैद्यकीय महाविद्यालयात नाही . आणि जर शिकवायचाच असेल तर अजून एक गोष्ट जरूर करावी . पाकिस्तानी सीमेवरील सैन्याच्या बंदुका, तोफा काढून घ्याव्यात आणि त्याना जिरेटोप , वाघनखे आणि ऐतिहासिक भाले बरच्या वाटण्यात याव्यात .

--------

१७ मार्च, २०१४

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती



विज्ञानाच्या चष्म्यातून जाती 


( जात पात  आणि जातिव्यवस्था यातला मूर्खपणा विज्ञान , बुद्धिवाद , गणित आणि लॉजिकने खोडून काढणारा मनोरंजक लेख …… )


तुमचे पूर्वज किती ?


स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे .  आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे .

चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप  असू द्या  .  आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत . तुमचे पूर्वज किती ? तुमच्या पूर्वजांच्या संख्येत जातीव्यवस्थेचे गुपित  दडले आहे . आई  आणि बाप हे दोन पूर्वज झाले . आजी आजोबा दोन्हीकडचे पकडले तर ४ होतात आणि दोन पिढ्यांमागे पुर्वजांची संख्या होते ४. तीन पिढ्या मागे गेले तर हि संख्या आठ वर जाते . आपल्या पैकी प्रत्येकाला आठ पणजी पणजोबा आहेत . हि संख्या भूमितीय गतीने वाढत जाते. जितक्या पिढ्या मागे जायचे आहे तितक्या वेळेला दोन या संख्येला दोन ने  गुणायचे आहे . साधे शाळेतले गणित ! आजी आजोबांच्या पिढीत म्हणजेच दोन पिढ्या मागे आपल्या पूर्वजांची संख्या दोनाचा दुसरा घात = ४ एव्हढी असते. तीन पिढ्या मागे गेले तर पूर्वजांची संख्या ८ आहे . चार पिढया पूर्वी दोनाचा चौथा घात म्हणजे आपले १६ पूर्वज होतात . इथ पर्यंत ठीक आहे .   जितक्या पिढ्या मागे जायचे तितक्या वेळेला दोन ला दोन ने गुणले कि आपल्याला पूर्वजांची संख्या मिळते . ज्या पिढीतल्या पूर्वजांची संख्या शोधायची आहे त्या संख्ये एव्हढा दोनाचा घात त्या पिढीतल्या आपल्या पूर्वजांची संख्या दाखवेल हे गणिती सूत्र आपल्याला मिळाले !

पण जातीचा अभिमान केवळ या सोळा पूर्वजा पर्यंतच मर्यादित नाही . प्रत्येक जातीला कमीत कमी दोन हजार वर्षापुर्वीच्या पुर्वाजाबद्दल प्रेम वाटत असते . त्यांचा अभिमान वाटत असतो . आणि दोन हजार वर्षापूर्वीच्या अपमानाचे उट्टेहि काढायचे असतात .


1) गणित पहिले : अफ़ाट पुर्वज 


साधारण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . खरे तर इतिहासात यापेक्षा लवकर मुले होत आली आहेत . तरी आपल्या गणिताच्या सोयीसाठी आपण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . म्हणजे शंभर वर्षात चार पिढ्या झाल्या. हजार वर्षात चाळीस पिढ्या होतील . आणि दोन हजार वर्षात ८० पिढ्या होतात . आणि आपण आधीच सिद्ध केल्यानुसार दोन हजार वर्षापूर्वी तुमच्या पूर्वजांची संख्या मोजण्याचे सूत्र आपल्याला ठाउक झाले आहेच . ती संख्या येईल दोनाचा ८० वा घात .







दोनाचा ८० वा घात . दोन ला ८० वेळा दोन ने गुणायचे आहे . इथे मात्र आपल्याला सायनटिफ़िक केलक्युलेटर लागणार आहे. एक्स  चा वाय वा घात काढण्याचे एक बटण त्या  केलक्युलेटर वर आहे .
 २ चा ८० वा घात = 1208925819614629174706176 अशी एक अगडबंब संख्या मिळते .
हि संख्या आपण वाचूही शकत नाही . आजही पृथ्वीची तेव्हढि लोकसंख्या नाही . बरे हे पूर्वज एका माणसाचे झाले बरका ! आजच्या सर्व माणसांचे पूर्वज याच गणिताने काढले आणि त्यांची बेरीज केली तर तेव्हढि माणसे उभी करायला शंभर पृथ्व्यांचे क्षेत्रफ़ळ हि पुरणार नाही . या पहिल्या गणिती संकल्पनेला अफ़ाट पुर्वज असे नाव देऊ . काहीतरी चुकते आहे नक्की ! नेमके काय  चुकते आहे ? ? ते पुढे पाहूच …  पण स्वत:ची  जात आणि पूर्वज याविषयी थोडा वेगळा विचार करावा लागणार हे नक्की ....  !! .


नातेवाइकात अंतर्गत लग्ने  होतात . 

एकाच कुटुंबात लग्ने होत असतात . आणि आपण ज्यांच्याशी लगिन  करू शकतो असे आपले रक्त बांधव म्हणजेच "जात" हे तर आपण विसरूनच गेलो कि !  अनेक जातीत विवाह करण्यापूर्वी पदर जुळवण्याचा विधी आहे .  आपल्या आधीच्या पिढ्यात कोणि नातेवाइकानि लग्न केले आहे का ? हे तपासले जाते आणि मग तसा पदर आधीच्या पिढीत जुळला असेल तरच लग्न केले जाते . म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यात नातेवाइकात लग्ने  झालेली आहेत . दूरचे चुलत मावस भाऊ बहिण लग्न करत असतात त्यामुळे आपले पूर्वज अगडबंब संख्येत नसतात . समजा तीन पिढ्यांपूर्व आपल्या सोळा पुर्वाजात कोणि चुलत मावस सोयरिक जुळवली असेल तर चार पिढ्या पूर्वीच्या पणजोबांची संख्या कमी भरते….  कारण चुलत मावस बहिण भावांचे काही पणजोबा समान असणार आहेत .  चला म्हणजे आपल्या पूर्वजांची संख्या 1208925819614629174706176 एव्हढी अगडबंब नाही . नात्यातल्या लग्नांना धन्यवाद ! नाइतर लई पितरांचे पारणे फेडत बसावे लागले असते !

चला.  पुन्हा एकदा आरामखुर्चीत रेला . गरम वाफ़ाळत्या कॉफीचा  अजून एक घुटका घ्या . आता आपण  उलटे गणित करणार आहोत . आपले आधीचे गणित साफ चुकले आहे . नव्याने विचार करावा लागणार आहे . दर वर्षी पृथ्वीची लोकसंख्या वाढत जाते हे आपल्याला माहित आहे.  म्हणजे दर एक पिढीत मागे मागे गेले कि पूर्वजांची संख्या कमी कमी  होत गेली पाहिजे कारण साधारणत : एकापेक्षा जास्त मुले होण्याकडे कल असतो . चार पोरांचे आईबाप दोन असतात म्हणजे मागच्या पिढीत पुर्व जांची संख्या वर्ग मुळा  एव्हढी झाली ! पूर्वीचे गणित प्रत्यक्षात उलटे चाललेले दिसते !    मगाशी आपण एका व्यक्तीच्या पूर्वजांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला . आता उलटा विचार करू या .


आज  पृथ्वीवरच्या सर्व माणसांचे पूर्वज किती होते ?
ते शोधून काढु ! विचार करायला सोपे जावे म्हणुन एक छोटे गाव उदाहरणार्थ  घेऊ .




2 ) गणित दुसरे : दोनच  पूर्वज : आदम आणि इव्ह


पश्चिम महाराष्ट्रातले एक गाव सावरखेड ! चला तर या काल्पनिक गावात समजा आज पाचशे लोक रहात आहेत . आधीच्या पिढीत किती बरे लोक रहात असतील ?  समजा या गावाची लोकसंख्या स्थिर आहे .  गेले कित्येक वर्षे इथे ५०० च लोक राहतात . मग आजच्या ५०० लोकांचे पूर्वज किती ? इथे काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत .

१) काही लोक नपुंसक असतात .
२) काही लग्ना आधीच मारून जातात
३) काहीची मुले लवकर मरतात

म्हणजे आजच्या पाचशे लोकांचे पूर्वज किती ?  काही लोकाना स्वत:चे वंशसातत्य राखता येत नाही हे लक्षात घेतले तर सहज लक्षात येईल कि ५०० लोकांचे पूर्वज ५०० पेक्षा कमी असणार ! काही वंश प्रत्येक पिढीत नामशेष होणार . आपल्या गणिताच्या सोयीसाठी . ५०० लोकांचे पूर्वज ४९० आहेत असे मानु ! दहा लोक दर पिढीत नपुंसक तरी निघतात किंवा मुले होण्या आधीच खपतात .

एक पिढी पूर्वीचा इतिहास पाहिला तर  सावरखेडात ५०० च लोक राहत होते पण ते सर्व आजच्या सावरखेड करांचे पूर्वज नाहीत . दहा लोकांचा वंश नाश झालेला आहे . म्हणजे आजच्या जिवंत पाचशे लोकांचे एका पिढी पूर्वी ४९० वंशज होते. दोन पिढ्यांपूर्वी देखील वंश नाशाचा जीवशास्त्रीय नियम लागू होतोच ! दोन पिढ्या मागे गेले तर विस वंशाचे सातत्य तुटले आहे . आणि आजच्या ५०० जिवंत लोकांचे उगमस्थान म्हणजे दोन पिढ्यान पूर्वीचे ४८० लोक . कोणत्याहि कुटुंबाची वंशावळ पाहिली तर मुले न झालेले असे अनेक विवाहित आणि अविवाहित लोक दिसतील .









आजच्या लोकसंखेचे पालकत्व कमी पूर्वजांकडे असते हा मुद्दा आहे . जर पन्नास पिढ्या मागे गेले . आणि दर पिढीत दहा लोकांचे वंश सातत्य तुटते असे मानले तर आजच्या सावरखेड गावाचे सर्व लोक एकाच माता पित्याची आपत्ये आहेत. हे झाले सावरखेडचे आदम आणि इव्ह ! याला आपण आदम इव्हचे गणित म्हणु .

हे गणित फार विण्ट्रेस्टिंग आहे ! समजा दर पिढीत दहा नाही एकाच माणसाचे वंश सातत्य तुटते असे मानले तर पन्नास पिढ्यापुर्वि आजच्या लोक संख्येचे ४९० पूर्वज होते असे मानणे भाग आहे . पण मग ५०० पिढ्यांपूर्वी काय ? पुन्हा आपल्याला सावर खेडचे ५०० पिढ्या जुने दोनच आदम इव्ह मिळतात ! म्हण्जे सवाल फकस्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच आहे !  गावाची लोकसंख्या कितीही असो ! नपुंसकांची संख्या कितीही असो ! पुरेशा पिढ्या मागे गेले कि सर्वांचे कोमन आई बापच मिळणार आहेत . फकस्त जरा जास्त पिढ्या मागे जावे लागेल ! म्हणजे प्रत्येक गावातले सर्व लोक एकमेकांचे बांधव आहेत हे मानणे भाग आहे .

हे गणितही उघडच चुकले आहे ! कारण गावाबाहेर लग्ने  होतातच . आपले गृहीतकच चुकले होते . च्यामारी ! पण हाच नियम सार्या पृथ्वी लाच लागू केला तर ? पृथ्वीबाहेर लग्न करण्याची पद्धत नाही . दर पिढीत काही लोक नपुंसक निघणारच. काही वंशांचा नाश होणारच .  आणि पुरेशा पिढ्या मागे गेले तर आजच्या सर्व मानव जातीचे समान पुर्वज मिळतील !

आरामखुर्चीत रेलून कॉफीचे घुटके घेत आपण मानवता सिद्ध केली आहे आणि जातिवाद खोटा  ठरवला आहे ! थांबा एका मिनिटासाठी काहीतरी चुकते आहे    हे नक्की ....  !!




3 ) दोनही गणितांचा मसावि :  मानवाची वैज्ञानिक  महामाय 


आपले पूर्वज संख्येने भरपूर आहेत . त्यांनी परस्परात लग्ने  केलेली आहेत आणि अनेक मानवांना स्वत:चे वंश सातत्य राखता येत नाही हे आपण वरील दोन्ही शक्यतात पडताळून पाहिले . या दोन्ही गणिती प्रक्रिया जीवशास्त्रात एकाच वेळी चालू आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे .

पृथ्वीची लोकसंख्या दर सेकंदाला वाढते आहे . याचाच दुसरा अर्थ असा की दर सेकंदाला आजच्या जिवंत माणसांच्या वंश सातत्यातल्या पूर्वजांची संख्या कमी होते आहे . फक्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच हिशेब बाकी आहे . मानवाच्या पुरेशा पिढ्या होऊन गेल्या … कि आजच्या भूतलावरची सर्व ,माणसे एकाच मातेची लेकरे उरणार हे उघड आहे .


आता प्रश्न असा आहे कि खरोखर मानवाच्या इतक्या पिढ्या होऊन गेल्या आहेत का ? उत्तर होय असे आहे !


 आजच्या मानवाची मूळ माता ९९००० ते २००००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत असावी . मात्र तिच्या काळातील ती एकमेव स्त्री नव्हती. फक्त तिची माता सोडून इतर स्त्रियांना आजच्या एखाद्या जिवंत स्त्री पर्यंत अखंड वंश साखळी निर्माण करता आली नाही . तसेच हि मूळ माता हि एक पदवी असून विशिष्ठ स्त्रीच मूळ माता असेही ठाम सांगता येत नाही . कारण मूळ माता ठरण्यासाठी तिला अखंड वंश सातत्य असलेल्या किमान दोन मुली असणे आवश्यक असते . जेव्हा एखाद्या वंश रेषेतील शेवटची स्त्री मारते तेव्हा हे वंश सातत्य खंडित झाल्याने मूळ माता पदवी पुढच्या पिढीकडे सरकते . म्हणजेच मूळ माता हि विशिष्ट व्यक्ती नसून कालांतराने बदलू शकणारी व्यक्ती असते . 









या स्त्रीला पिढीगणिक बदलू शकणारी कॉमन मदर इव्ह -  वैज्ञानिक  महामाय म्हणतात . 





थोडक्यात सर्व मानवांची आई एकाच आहे . मग बापाचे काय ?



खरी गम्मत इथून सुरु होते . हि  जी कोणि काळानुसार बदलणारी  वैज्ञानिक  महामाय आहे ती केवळ आरामखुर्चीत कॉफीचे घुटके  घेत  - मेंदूचे व्यायाम करत गवसलेली नाही . त्यासाठी शास्त्रज्ञांनी जगातल्या १३५ भिन्न भिन्न जमातींच्या  स्त्रियांचे रक्त तपासले आहे . मायटोकोण्ड्रिया म्हणजे  पेशीचे उर्जा केंद्र . आपल्या डी एन ए चा अर्धा भाग पित्याकडून आणि अर्धा भाग मातेकडून येत असतो .  मात्र आपणा सर्वाना हे मायटोकोण्ड्रिया मात्र फक्त मातेकडून मिळत असतात.  म्हणजे आजच्या सर्व प्रजातीच्या स्त्रियात आणि पुरुषात असलेले मायटोकोण्ड्रिया त्याना त्याच्या मातेपासून मिळाले आहेत . शास्त्रज्ञांनी पिग्मी ते अंदमानी आदिवासी ते आफ्रिकन ते युरोपियन अशा सर्व भिन्न १३५ प्रजातींच्या स्त्रियांचे  मायटोकोण्ड्रियल डी एन ए तपासले . त्यात दर पिढीत होणारे म्युटेशन आणि मोलेक्युलर क्लोक यांच्या अभ्यासावरून निश्कर्ष काढले . त्यानुसार हि मायटोकोण्ड्रियल कॉमन मदर इव्ह -  वैज्ञानिक  महामाय सिद्ध केलेली आहे.हि थेअरि बायबल च्या विरुद्द असल्याने धर्म मार्तण्ड सन्तप्त आहेत। 

 . 
मानवाच्या दर पिढीत काही वंशाचा नाश होत असल्याने हि महामाय दर पिढीतही बदलू शकते ! म्हणजे आजचे सर्व मानवांची माता मिळते पण पिता नाही . कारण दर पिढीत गुणुसुत्रे बदलत असतात . लग्न केल्याने त्यांचे मिश्रण होत असते . त्यामुळे आपल्या रक्तात अनेक पुरुष पूर्वजांची गुणसुत्रे खेळत असतात . आणि तत्कालीन महामायेचा तत्कालीन पती तत्कालीन बाप असतो ! 


आता एव्हढे सगळे समजून घेतल्यावर कोणाला स्वत:चा वंश , जात आणि बापजादे  यांचा अभिमान  बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा ! वेदातले पुरुषसुक्त आणि बायबल कुराणातलि एकमेव आणि न बदलणारे  "आदम इव्ह"  हीच मानवी उत्पत्तीची खरी थेअरी मानायची असेल तर खुशाल मानावी !


Ref : River Out of Eden: A Darwinian View of Life is a 1995 popular science book by Richard Dawkins


१७ डिसें, २०१३

कॉन्सपिरसी थिअरि : होऊ दे खर्च !


कॉन्सपिरसी थिअरि : होऊ दे खर्च !


आपल्या आजूबाजूला भयंकर कट आणि कारस्थाने सुरु आहेत . आपल्याला उल्लू बनवले जात आहे .फसवले जात आहे. खरे वास्तव वेगळे आहे . आणि दाखवल जातय काहीतरी भलतच ! हे मिडियात येत नाही कारण मिडिया हाच एका महाभयंकर कटाचा भाग आहे

हि अतिशय लाडकी आणि झटक्यात लोकप्रिय ठरणारी थेअरी आहे . अमेरिकेतल्या टोप टेन कोन्स्पिरसी थेअरी खालच्या व्हिडियो लिंक मध्ये पहायला मिळतील . यात औषध कंपन्या पैसे कमावण्यासाठी आजारांचे विषाणू पसरवतात , लोकांचे मेंदु नष्ट - भ्रमिष्ट करून त्यांच्यावर राज्य करण्यासाठी सरकार पाण्यात फ़्लोराइड मिसळते , इल्युमिनाटि नावाचा धर्मगट जगावर राज्य करण्यासाठी - युद्धे , माइंड कंट्रोल रसायने वगैरे वापरत असतो. 








शिवाय पर्ल हार्बर अमेरिकन सरकारने मुद्दामच घडू दिले - अमेरिकन राश्ट्राध्यक्ष रूझवेल्ट ते रोखू शकला असता पण त्याला युद्धात उतरायचे होते । म्हणुन त्याने गुप्तचर यंत्रणेच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले , ९ -११ ची घटना अमेरिकन सरकारनेच घडवली कारण त्यांना मध्यपूर्वेतल्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध करायचे होते ! अमेरिकन स्वभावाल अनुसरून सर्व कोन्स्पिरसि थेअरी मांडल्या गेल्या आहेत - सर्वच्या सर्व पैशाशी नायतर पेट्रोल च्या भावाशी संबधित आहेत !!

अशीच एक गाजलेली थेअरी होती चंद्रावर माणुस उतरलाच नाही । आणि सामन्य माणसाला पटतील असे त्याचे खोटेच व्हिडिओ नासा ने तयार केले आहेत .त्याबाजुचे आणि विरुद्ध असे हजारो व्हिडियो आणि लेख इंटर्नेट वर प्रसिद्ध आहेत .

भारतातही अशा अनेक कोन्स्पिरसि थेअरी आहेत . 


१ ) नेहरू मुसलमान होता , इंदिरेचा नवरा फिरोझ मुसलमान होता , आणि राजीव आणि त्याच्या मुलांचा ख्रिस्ती बात्मिस्मा सोनियाने घडवला .

२) नथूरामने दंगल घडवण्यासाठी गांधिजिंना मारण्या आगोदर स्वत:ची सुंता केली होती .

३) मक्केत शिवलिंग आहे . ते चादरीखाली लपवले आहे .


हिंदु स्वभावानुसार या सार्या कोन्स्पिरसी थेअरी मुसलमानांशि निगडित आहेत . मुसलमान एडस पसरवतात (गर्दीत सुया टोचून) म्हणुन कर्नाटकात उडपी जिल्ह्यात एक दंगलहि झालेली आहे .


बाम्सेफी मंडळिंनि त्यांच्या स्वभावानुसार काही कोन्स्पिरसि थेअरी स्वीकारल्या आहेत … यात प्रामुख्याने शेटजी - भटजिंचे एक गुप्त मंडळ सतत भारताचा इतिहास , भूगोल , नागरिकशास्त्र इत्यादी बदलत असते . आंबेडकरांचा मतदार संघ पाकिस्तानात जावा म्हणुन गांधीने फाळणी केली. अशा प्रकारच्या थेअरी प्रसूत केल्या आहेत .


या कटकारस्थानाच्या थेअर्यांवर अनेकांचा मनापासून विश्वासही असतो .
आणि हे जगात सर्वत्र चालते .




त्याची कारणे :


१) आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून निष्कर्ष काढणे हि माणसाच्या मेंदूची पद्धत आहे .

२) पण त्याच वेळी काही महत्वाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे आपण उत्क्रांतीत शिकलो आहोत . आपल्या आजू बाजूला रेडिओचा आवाज चालू आहे , कावळा ओरडतो आहे , कुत्रा भुंकतो आहे … पण रस्ता क्रोस करताना आपल्याला फक्त ट्रकचा हॉर्नच ऐकू येतो । . बाकी काही नाही .। बिन महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे वरदान मानवी उत्क्रांतीत आपण निसर्गाकडून शिकलो आहोत . जगण्यासाठी ते आवश्यकही आहे .

३) महत्वाचे काय ? आणि बिन महत्वाचे काय ? हे आपण - संस्कार , वाचन , नातेवाइक - मित्र यांकडून मिळणारी माहिती यावरून ठरवतो.

४) मग महत्वाच्या तेव्हढ्याच गोष्टी लक्षात ठेवतो (तथाकथित बिन महत्वाच्या विसरून जातो ).

५) मग आपल्या संस्कारानुसार महत्वाच्या वाटणार्या गोष्टींची एक तर्क संगति आपला मेंदु आपोआप लावतो - आणि त्यातून आपला स्वभाव म्हणा किंवा अनेकांचे सारखे स्वभाव एकत्र येउन जन्माला येणार्या विचारधारा (इझम ) म्हणा - जन्माला येतात आणि वाढतात .

६) पण आपण अनेक तथाकथित बिन महत्वाच्या गोष्टी विसरून गेलेलो असतो . त्यामुळे आपल्या स्वभावाला किंवा विचारधारेला (इझम) ला न मानवणार्या गोष्टी आपल्याला दिसतच असतात .

उदाहरणार्थ अमेरिका हा महाचोर भांडव्लदरांचा देश आहे हे लाडके डावे गृहीतक आहे . मग रशिया सारख्या महान देशा आधी ते कसे काय चंद्रावर पोचतील ? पण त्यांचे चंद्रावर्चे फ़ोटो तर दिसतायत खरे !

७) यावेळी आली हुक्की मारली बुक्की च्या आवेशात एखाद्या कोन्स्पिरसि थेअरी चा जन्म होतो . नासा ने खोटेच व्हिडियो बनवले ! - नवे सत्य स्विकारण्यापेक्षा - कोन्स्पिरसि थेअरी वर विश्वास ठेवणे मानवी मेंदुला अधिक सोपे असते .

८) हे पूर्णत: नैसर्गिक आहे … प्राणि नुसतेच आकलन करत बसला तर मारूनच जाइल त्याला काही निश्कर्ष काढावेच लागतात आणि त्यावर विश्वास ठेवून निर्णय करावे लागतात . 

या उत्क्रांतीच्या देणगितच या थिअर्यांचे मर्म आहे .







२६ नोव्हें, २०१३

तटस्थ पणा भूमिकेत असतो बच्चमजी … प्राण्यांच्या संख्येत नाही ।

१० वि ११ वि एवढेही सामन्य ज्ञान नसणार्या पोट्ट्यानि ट्याग मारावा … खाली पिली काय पिन फालतू प्रश्न विचारावा आणि आम्ही त्यांचे प्रामाणिकपणे शंका निरसन करावे … एव्हढे सारे झाले कि आमचे हेतूच मुळात भ्रष्ट आहेत असेही ऐकून घ्यावे … इस्स्कू बोलते फेसबुक . आम्हाला ट्याग मारून अशाप्रकारे प्रश्न विचाराले जातात 

पोट्टा : काय बे तू शेकुलर ना मंग जिराफ़ांबद्दल च का बोलतोस ? झेब्र्यांबद्दल का नाई बोलत ?







आम्ही : त्याच काय हाय कि झेब्रे जरा मोठे असत्यात म्हून त्यांच्याबद्दल आधी लिवलय

पोट्टा: मंग हि घे उदाहरण … झेब्र्यान मांजि गाजर खाल्ली , मुळे खाल्ले इ इ
आम्ही : असेल मंग

पोट्टा : एकाचवेलि सर्व प्राण्यांबद्दल बोलला पायजेल मंगच तू शेकुलर
आम्ही : एकाच वेळी सर्वांबद्दल कसा बोलता यील ?

पोट्टा : नाय नाय - काय पिन चालणार नाई … कुटल् बी वाक्य बोलण्या अगुदर मुंगी पासून दाय्नोसोर पर्यंत सर्व प्राण्यांची नाव घ्याय्ले पायजेल
आम्ही : कसा शक्य आहे ?

पोट्टा : मंग कसला रे तू शेकुलर ! मंग कसला रे तू तटस्थ ! ( मनात : कशी जिरवली बच्चमजी !)

आम्ही : सगल्या प्राणी लोकांबद्दल एकदम बोललो तर तटस्थ होय रे ? एकाच प्राण्याबद्दल तटस्थ भूमिका घेऊ शकत नाही ?

तटस्थ पणा भूमिकेत असतो बच्चमजी … प्राण्यांच्या संख्येत नाही ।

नाय तर उद्या बोलशिला कि मंगल ग्राहवरल्या प्राण्यांचे अपराध तुला दिसे नाय … अहो हि मानवी भाषेची पाद्धत आहे। तर्क संगतीची पद्धत आहे .


पोट्टा : आता कसा धरला …. बघ मी म्हनलो व्हतो कि नाय … तुले झेब्र्यांचे अपराध दिसत नायत … साला आंधला खविस ।

आम्ही : अहो मी मागे म्हटलो होतो ना … कि प्राणि संग्रहालयच बंद करून टाका … आणि सगळ्यांनी माणुसकीचा धर्म पाळा

पोट्टा : हे तू जिराफ़ांनाच का सांगतोस ?

आम्ही : अहो मी प्राणिसंग्रहालय हा शब्द्द वापरला होता . त्यात सगळे येतात

पोट्टा : त्यावेळी पण तुमच्या मनात जिराफच असतात… कसा पकडला चोराला

आम्ही: ठिक आहे यापुढे मी प्राण्यांबद्दल बोलणारच नाय … हाय काय आणि नाय काय । चल आपण नदी बद्दल बोलू

पोट्टा : बघ मी म्हणालो व्हतो कि नाय । तू झेब्र्यांच्या बाजूचा हायस … झेब्रे नदीवर पाणी पित्यात म्हून तू नदीबद्दल बोलतो … कसा पकडला भामट्याला …

आम्ही : होऊ दे खर्च

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *