विज्ञानाच्या चष्म्यातून जाती
( जात पात आणि जातिव्यवस्था यातला मूर्खपणा विज्ञान , बुद्धिवाद , गणित आणि लॉजिकने खोडून काढणारा मनोरंजक लेख …… )
तुमचे पूर्वज किती ?
स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे . आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे .
चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप असू द्या . आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत . तुमचे पूर्वज किती ? तुमच्या पूर्वजांच्या संख्येत जातीव्यवस्थेचे गुपित दडले आहे . आई आणि बाप हे दोन पूर्वज झाले . आजी आजोबा दोन्हीकडचे पकडले तर ४ होतात आणि दोन पिढ्यांमागे पुर्वजांची संख्या होते ४. तीन पिढ्या मागे गेले तर हि संख्या आठ वर जाते . आपल्या पैकी प्रत्येकाला आठ पणजी पणजोबा आहेत . हि संख्या भूमितीय गतीने वाढत जाते. जितक्या पिढ्या मागे जायचे आहे तितक्या वेळेला दोन या संख्येला दोन ने गुणायचे आहे . साधे शाळेतले गणित ! आजी आजोबांच्या पिढीत म्हणजेच दोन पिढ्या मागे आपल्या पूर्वजांची संख्या दोनाचा दुसरा घात = ४ एव्हढी असते. तीन पिढ्या मागे गेले तर पूर्वजांची संख्या ८ आहे . चार पिढया पूर्वी दोनाचा चौथा घात म्हणजे आपले १६ पूर्वज होतात . इथ पर्यंत ठीक आहे . जितक्या पिढ्या मागे जायचे तितक्या वेळेला दोन ला दोन ने गुणले कि आपल्याला पूर्वजांची संख्या मिळते . ज्या पिढीतल्या पूर्वजांची संख्या शोधायची आहे त्या संख्ये एव्हढा दोनाचा घात त्या पिढीतल्या आपल्या पूर्वजांची संख्या दाखवेल हे गणिती सूत्र आपल्याला मिळाले !
पण जातीचा अभिमान केवळ या सोळा पूर्वजा पर्यंतच मर्यादित नाही . प्रत्येक जातीला कमीत कमी दोन हजार वर्षापुर्वीच्या पुर्वाजाबद्दल प्रेम वाटत असते . त्यांचा अभिमान वाटत असतो . आणि दोन हजार वर्षापूर्वीच्या अपमानाचे उट्टेहि काढायचे असतात .
1) गणित पहिले : अफ़ाट पुर्वज
साधारण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . खरे तर इतिहासात यापेक्षा लवकर मुले होत आली आहेत . तरी आपल्या गणिताच्या सोयीसाठी आपण पंचविसाव्या वर्षी मुले होतात असे गृहीत धरू . म्हणजे शंभर वर्षात चार पिढ्या झाल्या. हजार वर्षात चाळीस पिढ्या होतील . आणि दोन हजार वर्षात ८० पिढ्या होतात . आणि आपण आधीच सिद्ध केल्यानुसार दोन हजार वर्षापूर्वी तुमच्या पूर्वजांची संख्या मोजण्याचे सूत्र आपल्याला ठाउक झाले आहेच . ती संख्या येईल दोनाचा ८० वा घात .
दोनाचा ८० वा घात . दोन ला ८० वेळा दोन ने गुणायचे आहे . इथे मात्र आपल्याला सायनटिफ़िक केलक्युलेटर लागणार आहे. एक्स चा वाय वा घात काढण्याचे एक बटण त्या केलक्युलेटर वर आहे .
२ चा ८० वा घात = 1208925819614629174706176 अशी एक अगडबंब संख्या मिळते .हि संख्या आपण वाचूही शकत नाही . आजही पृथ्वीची तेव्हढि लोकसंख्या नाही . बरे हे पूर्वज एका माणसाचे झाले बरका ! आजच्या सर्व माणसांचे पूर्वज याच गणिताने काढले आणि त्यांची बेरीज केली तर तेव्हढि माणसे उभी करायला शंभर पृथ्व्यांचे क्षेत्रफ़ळ हि पुरणार नाही . या पहिल्या गणिती संकल्पनेला अफ़ाट पुर्वज असे नाव देऊ . काहीतरी चुकते आहे नक्की ! नेमके काय चुकते आहे ? ? ते पुढे पाहूच … पण स्वत:ची जात आणि पूर्वज याविषयी थोडा वेगळा विचार करावा लागणार हे नक्की .... !! .
नातेवाइकात अंतर्गत लग्ने होतात .
एकाच कुटुंबात लग्ने होत असतात . आणि आपण ज्यांच्याशी लगिन करू शकतो असे आपले रक्त बांधव म्हणजेच "जात" हे तर आपण विसरूनच गेलो कि ! अनेक जातीत विवाह करण्यापूर्वी पदर जुळवण्याचा विधी आहे . आपल्या आधीच्या पिढ्यात कोणि नातेवाइकानि लग्न केले आहे का ? हे तपासले जाते आणि मग तसा पदर आधीच्या पिढीत जुळला असेल तरच लग्न केले जाते . म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यात नातेवाइकात लग्ने झालेली आहेत . दूरचे चुलत मावस भाऊ बहिण लग्न करत असतात त्यामुळे आपले पूर्वज अगडबंब संख्येत नसतात . समजा तीन पिढ्यांपूर्व आपल्या सोळा पुर्वाजात कोणि चुलत मावस सोयरिक जुळवली असेल तर चार पिढ्या पूर्वीच्या पणजोबांची संख्या कमी भरते…. कारण चुलत मावस बहिण भावांचे काही पणजोबा समान असणार आहेत . चला म्हणजे आपल्या पूर्वजांची संख्या 1208925819614629174706176 एव्हढी अगडबंब नाही . नात्यातल्या लग्नांना धन्यवाद ! नाइतर लई पितरांचे पारणे फेडत बसावे लागले असते !
चला. पुन्हा एकदा आरामखुर्चीत रेला . गरम वाफ़ाळत्या कॉफीचा अजून एक घुटका घ्या . आता आपण उलटे गणित करणार आहोत . आपले आधीचे गणित साफ चुकले आहे . नव्याने विचार करावा लागणार आहे . दर वर्षी पृथ्वीची लोकसंख्या वाढत जाते हे आपल्याला माहित आहे. म्हणजे दर एक पिढीत मागे मागे गेले कि पूर्वजांची संख्या कमी कमी होत गेली पाहिजे कारण साधारणत : एकापेक्षा जास्त मुले होण्याकडे कल असतो . चार पोरांचे आईबाप दोन असतात म्हणजे मागच्या पिढीत पुर्व जांची संख्या वर्ग मुळा एव्हढी झाली ! पूर्वीचे गणित प्रत्यक्षात उलटे चाललेले दिसते ! मगाशी आपण एका व्यक्तीच्या पूर्वजांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला . आता उलटा विचार करू या .
आज पृथ्वीवरच्या सर्व माणसांचे पूर्वज किती होते ?
ते शोधून काढु ! विचार करायला सोपे जावे म्हणुन एक छोटे गाव उदाहरणार्थ घेऊ .
2 ) गणित दुसरे : दोनच पूर्वज : आदम आणि इव्ह
पश्चिम महाराष्ट्रातले एक गाव सावरखेड ! चला तर या काल्पनिक गावात समजा आज पाचशे लोक रहात आहेत . आधीच्या पिढीत किती बरे लोक रहात असतील ? समजा या गावाची लोकसंख्या स्थिर आहे . गेले कित्येक वर्षे इथे ५०० च लोक राहतात . मग आजच्या ५०० लोकांचे पूर्वज किती ? इथे काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत .
१) काही लोक नपुंसक असतात .
२) काही लग्ना आधीच मारून जातात
३) काहीची मुले लवकर मरतात
म्हणजे आजच्या पाचशे लोकांचे पूर्वज किती ? काही लोकाना स्वत:चे वंशसातत्य राखता येत नाही हे लक्षात घेतले तर सहज लक्षात येईल कि ५०० लोकांचे पूर्वज ५०० पेक्षा कमी असणार ! काही वंश प्रत्येक पिढीत नामशेष होणार . आपल्या गणिताच्या सोयीसाठी . ५०० लोकांचे पूर्वज ४९० आहेत असे मानु ! दहा लोक दर पिढीत नपुंसक तरी निघतात किंवा मुले होण्या आधीच खपतात .
एक पिढी पूर्वीचा इतिहास पाहिला तर सावरखेडात ५०० च लोक राहत होते पण ते सर्व आजच्या सावरखेड करांचे पूर्वज नाहीत . दहा लोकांचा वंश नाश झालेला आहे . म्हणजे आजच्या जिवंत पाचशे लोकांचे एका पिढी पूर्वी ४९० वंशज होते. दोन पिढ्यांपूर्वी देखील वंश नाशाचा जीवशास्त्रीय नियम लागू होतोच ! दोन पिढ्या मागे गेले तर विस वंशाचे सातत्य तुटले आहे . आणि आजच्या ५०० जिवंत लोकांचे उगमस्थान म्हणजे दोन पिढ्यान पूर्वीचे ४८० लोक . कोणत्याहि कुटुंबाची वंशावळ पाहिली तर मुले न झालेले असे अनेक विवाहित आणि अविवाहित लोक दिसतील .
आजच्या लोकसंखेचे पालकत्व कमी पूर्वजांकडे असते हा मुद्दा आहे . जर पन्नास पिढ्या मागे गेले . आणि दर पिढीत दहा लोकांचे वंश सातत्य तुटते असे मानले तर आजच्या सावरखेड गावाचे सर्व लोक एकाच माता पित्याची आपत्ये आहेत. हे झाले सावरखेडचे आदम आणि इव्ह ! याला आपण आदम इव्हचे गणित म्हणु .
हे गणित फार विण्ट्रेस्टिंग आहे ! समजा दर पिढीत दहा नाही एकाच माणसाचे वंश सातत्य तुटते असे मानले तर पन्नास पिढ्यापुर्वि आजच्या लोक संख्येचे ४९० पूर्वज होते असे मानणे भाग आहे . पण मग ५०० पिढ्यांपूर्वी काय ? पुन्हा आपल्याला सावर खेडचे ५०० पिढ्या जुने दोनच आदम इव्ह मिळतात ! म्हण्जे सवाल फकस्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच आहे ! गावाची लोकसंख्या कितीही असो ! नपुंसकांची संख्या कितीही असो ! पुरेशा पिढ्या मागे गेले कि सर्वांचे कोमन आई बापच मिळणार आहेत . फकस्त जरा जास्त पिढ्या मागे जावे लागेल ! म्हणजे प्रत्येक गावातले सर्व लोक एकमेकांचे बांधव आहेत हे मानणे भाग आहे .
हे गणितही उघडच चुकले आहे ! कारण गावाबाहेर लग्ने होतातच . आपले गृहीतकच चुकले होते . च्यामारी ! पण हाच नियम सार्या पृथ्वी लाच लागू केला तर ? पृथ्वीबाहेर लग्न करण्याची पद्धत नाही . दर पिढीत काही लोक नपुंसक निघणारच. काही वंशांचा नाश होणारच . आणि पुरेशा पिढ्या मागे गेले तर आजच्या सर्व मानव जातीचे समान पुर्वज मिळतील !
आरामखुर्चीत रेलून कॉफीचे घुटके घेत आपण मानवता सिद्ध केली आहे आणि जातिवाद खोटा ठरवला आहे ! थांबा एका मिनिटासाठी काहीतरी चुकते आहे हे नक्की .... !!
3 ) दोनही गणितांचा मसावि : मानवाची वैज्ञानिक महामाय
आपले पूर्वज संख्येने भरपूर आहेत . त्यांनी परस्परात लग्ने केलेली आहेत आणि अनेक मानवांना स्वत:चे वंश सातत्य राखता येत नाही हे आपण वरील दोन्ही शक्यतात पडताळून पाहिले . या दोन्ही गणिती प्रक्रिया जीवशास्त्रात एकाच वेळी चालू आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे .
पृथ्वीची लोकसंख्या दर सेकंदाला वाढते आहे . याचाच दुसरा अर्थ असा की दर सेकंदाला आजच्या जिवंत माणसांच्या वंश सातत्यातल्या पूर्वजांची संख्या कमी होते आहे . फक्त किती पिढ्या मागे जायचे ? एव्हढाच हिशेब बाकी आहे . मानवाच्या पुरेशा पिढ्या होऊन गेल्या … कि आजच्या भूतलावरची सर्व ,माणसे एकाच मातेची लेकरे उरणार हे उघड आहे .
आता प्रश्न असा आहे कि खरोखर मानवाच्या इतक्या पिढ्या होऊन गेल्या आहेत का ? उत्तर होय असे आहे !
आजच्या मानवाची मूळ माता ९९००० ते २००००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत असावी . मात्र तिच्या काळातील ती एकमेव स्त्री नव्हती. फक्त तिची माता सोडून इतर स्त्रियांना आजच्या एखाद्या जिवंत स्त्री पर्यंत अखंड वंश साखळी निर्माण करता आली नाही . तसेच हि मूळ माता हि एक पदवी असून विशिष्ठ स्त्रीच मूळ माता असेही ठाम सांगता येत नाही . कारण मूळ माता ठरण्यासाठी तिला अखंड वंश सातत्य असलेल्या किमान दोन मुली असणे आवश्यक असते . जेव्हा एखाद्या वंश रेषेतील शेवटची स्त्री मारते तेव्हा हे वंश सातत्य खंडित झाल्याने मूळ माता पदवी पुढच्या पिढीकडे सरकते . म्हणजेच मूळ माता हि विशिष्ट व्यक्ती नसून कालांतराने बदलू शकणारी व्यक्ती असते .
या स्त्रीला पिढीगणिक बदलू शकणारी कॉमन मदर इव्ह - वैज्ञानिक महामाय म्हणतात .
थोडक्यात सर्व मानवांची आई एकाच आहे . मग बापाचे काय ?
खरी गम्मत इथून सुरु होते . हि जी कोणि काळानुसार बदलणारी वैज्ञानिक महामाय आहे ती केवळ आरामखुर्चीत कॉफीचे घुटके घेत - मेंदूचे व्यायाम करत गवसलेली नाही . त्यासाठी शास्त्रज्ञांनी जगातल्या १३५ भिन्न भिन्न जमातींच्या स्त्रियांचे रक्त तपासले आहे . मायटोकोण्ड्रिया म्हणजे पेशीचे उर्जा केंद्र . आपल्या डी एन ए चा अर्धा भाग पित्याकडून आणि अर्धा भाग मातेकडून येत असतो . मात्र आपणा सर्वाना हे मायटोकोण्ड्रिया मात्र फक्त मातेकडून मिळत असतात. म्हणजे आजच्या सर्व प्रजातीच्या स्त्रियात आणि पुरुषात असलेले मायटोकोण्ड्रिया त्याना त्याच्या मातेपासून मिळाले आहेत . शास्त्रज्ञांनी पिग्मी ते अंदमानी आदिवासी ते आफ्रिकन ते युरोपियन अशा सर्व भिन्न १३५ प्रजातींच्या स्त्रियांचे मायटोकोण्ड्रियल डी एन ए तपासले . त्यात दर पिढीत होणारे म्युटेशन आणि मोलेक्युलर क्लोक यांच्या अभ्यासावरून निश्कर्ष काढले . त्यानुसार हि मायटोकोण्ड्रियल कॉमन मदर इव्ह - वैज्ञानिक महामाय सिद्ध केलेली आहे.हि थेअरि बायबल च्या विरुद्द असल्याने धर्म मार्तण्ड सन्तप्त आहेत।
.
मानवाच्या दर पिढीत काही वंशाचा नाश होत असल्याने हि महामाय दर पिढीतही बदलू शकते ! म्हणजे आजचे सर्व मानवांची माता मिळते पण पिता नाही . कारण दर पिढीत गुणुसुत्रे बदलत असतात . लग्न केल्याने त्यांचे मिश्रण होत असते . त्यामुळे आपल्या रक्तात अनेक पुरुष पूर्वजांची गुणसुत्रे खेळत असतात . आणि तत्कालीन महामायेचा तत्कालीन पती तत्कालीन बाप असतो !
आता एव्हढे सगळे समजून घेतल्यावर कोणाला स्वत:चा वंश , जात आणि बापजादे यांचा अभिमान बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा ! वेदातले पुरुषसुक्त आणि बायबल कुराणातलि एकमेव आणि न बदलणारे "आदम इव्ह" हीच मानवी उत्पत्तीची खरी थेअरी मानायची असेल तर खुशाल मानावी !
Ref : River Out of Eden: A Darwinian View of Life is a 1995 popular science book by Richard Dawkins