८ एप्रि, २०१५

चार्वाक नावाचा चमत्कार

.
हजारो वर्षापूर्वी भारतात  विज्ञान  होते का   ?

उत्तर होय असे आहे.

पुराणातली विमाने म्हणजे विज्ञान  नाही . विज्ञान हि विचार करायची पद्दत आहे . त्याला बुद्धिवाद  - अथवा -    विज्ञाननिष्ठा असे म्हणतात. चमत्कार म्हणजे अपुरे  ज्ञान .  प्रत्येक घटनेला कार्य कारण भाव असतो . तो शोधत येऊ शकतो . दाखवता येतो .  म्हणुन प्रत्यक्ष  हेच प्रमाण मानले पाहिजे. असा उद्घोष हजार वर्षापूर्वी  दुमदुमत होता .  आपण अतिशय अभिमानाने जगातल्या पहिल्या बुद्धीवाद्याचे कौतुक केले पाहिजे .

चार्वाक हा प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचार येथे होता. हजारो वर्षापूर्वी -  भारतात .

वेदप्रामाण्य धिक्कारामुळे  वैदिक धर्माने त्यांना नास्तिक ठरवले   तर ऐहिक सुखांचा आनंद   शोधल्यामुळे  जैन, बुद्ध अशा  श्रमण मार्गाच्या तत्त्ववेत्त्यांनीही त्यांची कठोर निंदा केली. शरीर पीडेचा  वा दु:ख मुक्तीचा श्रमण मार्ग  चार्वाकाला अप्रस्तुत वाटतो . चार्वाक सुखवादी अहे.



------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्तिमृत्युरगोचर:।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

जग रे भावा समाधाने - सुखी रहा इहलोकी  ।   
राख झाली देहाची की - उरते ती सारी माती ।।

परिश्रम  कर . पराक्रम कर.  आणि  समाधानाने सुखाने जग . म्रुत्युनंतर  एकदा शरीराची राख झाली कि सारे संपते . पुनर्जन्म चांगला मिळावा या  भितिपोटि  कर्मकांड करत बसू नका . समाधी अवस्था झूट . केवल  ज्ञान थाप . आत्मा बकवास . निब्बाण  अशक्य .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------






चार्वाकाचे  हे उपदेश  विशुद्ध ऐहिक - जडवादी आहेत .त्याला परलोक तुच्छ , वेंद  नको, उपनिषद नको, ब्राम्हण  , अरण्यक - स्मृती इत्यादी ग्रंथ नको.

 बुद्धाच्या अष्टांग मार्गावर त्याचा विश्वास नाही.  जैनाची केवल ज्ञान हि चार्वाकाला  थाप वाटते .   जैन, बौद्ध,  वैदिक या सार्यांची टीका सहन करत आणि त्यांची उलटी खिल्ली उडवत चार्वाक -  भारतात हजारो  वर्षे दुमदुमत राहिले .

शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख  अकबर बादशहाच्या  काळात आढळतो . हा शहाणा  अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता . धर्माची  चर्चा आणि चिकित्सा करण्यासाठी अकबराने इबादतखाना नावाचे नवे ऑफिस उघडल्याचे इतीहासाने नोंदवले आहे. तिथे त्याने सगळ्या धर्माच्या पंडितांशि चर्चा केल्या .   उत्तर आयुष्यात १५८२ साली  अकबराने इस्लाम  धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच  धर्म काढला .त्याच्या  या नव धर्माला -  धर्म ग्रंथच  नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या  नव धर्म  स्थापनेवर कदाचित चार्वाक  मताचा अंशत: प्रभाव  असावा. अकबर कृत  दिने इलाहीच्या काही मताशी  चार्वाकाचे विलक्षण साम्य आढळून येते .




------------------------------------------------------------------------------------------------------------------------
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥

स्वर्ग नाही, मोक्ष नाही, परलोकीचा  आत्मा नाही 
वर्ण -आश्रम ,  कर्मकांडे फळ  तुला  देणार नाहीत ।।
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌ ।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥

यज्ञाचे ते अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड , राख फासती अखंड 
बुद्धी आणि पौरुष नाही   -  त्या षंढांच्या पोटाचा  धंदा ।।
------------------------------------------------------------------------------------------------------------------------



कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात/ वर्ण  ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण म्हणजे आपला  सुप्रसिद्ध कर्म- फल  सिद्धांत होय . ती त्याकाळची अर्थव्यवस्था सुद्धा आहे . पण त्यात शोषण आहे . आणि ते जन्मजात आहे .  

कर्म सिद्धांत , पुनर्जन्म , चातुर्वण -  वंशशुद्धी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टीका केली. पुनर्जन्म हा मुर्खपणा मानून हिणवला .  वंशशुद्धी ही वस्तुस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानतात.चार्वाक विचार वेदप्रामाण्य, ईश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्माचा सिद्धान्त, यज्ञादी कर्मकांडाची उपयुक्तता हे सर्व एकाच वेळी नाकारतो . केवळ 'प्रत्यक्ष' हेच प्रमाण मानतो .

बौद्धांचि दु:ख्मुक्तीची धडपड , निर्वाण ,  जैनांचा अनेकांतद - सारी दर्शने   - चार्वाक काहीच  जुमानत नाही. यज्ञाच्या आगीत बुधलाभर  तूप जाळून परलोकाची हाव   धरण्यापेक्षा….  तेच  तूप पिऊन शरीर व मन धष्टपुष्ट आणि  सशक्त  करा - असा जगण्याचा सरळ  साधा सोपा  आणी सुंदर  अर्थ चार्वाकाला अभिप्रेत आहे.




------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।
एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि ।।

शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून
 मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------




चार्वाक हि प्राचीन नास्तिकांचि भारतीय उपाधी आहे. यात ब्राह्मण आहेत, राक्षस आहेत, दैत्य आहेत, ऋषिमुनी आहेत,राजे महाराजे - गोर गरीब सारे आहेत ---- गम्मत  म्हणजे  कधी कधी देव पण आहेत  ! ( ज्याना इथर पोथ्या देवता म्ह्णतात ते) देवांचा गुरू बृहस्पती हा पहिला चार्वाक असल्याचे मानले जाते. शंकर- पुरंदर-  बृहस्पती अशी चर्वाकांची वैचारिक परंपरा सांगितली जाते. हि परंपरा अस्तिकांच्या ग्रंथातुन शोधता येते  . चार्वाक लोक्स ग्रंथ लिहिण्याचा भानगडीत पडले नसावेत किंवा आस्तिकांनि ते ग्रंथ नष्ट केले असावेत .

हे चार्वाक लोक  हजार वर्ष आस्तिकांना धर्माविषयी प्रश्न विचारून भंडावून  सोडत आले आहेत . या प्रश्नावर डोकी खाजवत - त्याचे खंडन मंडन  आणि  त्या चर्चेतून विविध भारतीय दर्शने - श्रद्धा  अणि तत्वज्ञ तयार झाले  असे अनेक अभ्यासक मानतात. चार्वाक विचारतो : -




------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥

यज्ञामध्ये बोकड मेला - जर तो आता स्वर्गी जाइल   ।
 यजमानाच्या पित्यासाठी मार्ग गवसला आम्हाला  ॥

यज्ञामधे बळी दिलेले बोकड जर स्वर्गात जात असतील तर यजमानाच्या  बापाला त्याच रस्त्याने थेट स्वर्गात का पाठवू नये ?  
------------------------------------------------------------------------------------------------------------------------





प्रत्यक्ष हेच प्रमाण. बाकी सब झुट . बाप  दाखव नाही तर श्राद्ध  कर - काल्पनिक थेअर्या चालणार नाहीत . जे प्रयोगात समजले तेच विज्ञान . प्रत्यक्षात दिसले तेच ज्ञान .  प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला.

धार्मिक छू छा  मंतर  - वेद मंत्र -  इत्यादी लिहिणारे हरामखोर -   भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत.असे स्पष्टपणे सांगितले .




------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम्‌ ॥

वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर   । 
जर्भरी, तुर्फरी, वगैरे अर्थहिन बकवास   ॥

जर्भरी, तुर्फरी असे (निरर्थक) वा आर्ष रानटी शब्द वेदात येतात . त्याची चार्वाकाने चेष्टा केली आहे
------------------------------------------------------------------------------------------------------------------------




आज ज्याला नास्तिक बुद्धिवादी विचार  म्हणून जगभर ओळखले जाते -  तो विज्ञान निष्ठेचा  विचार या भारत  भूमीत हजारो वर्षा आधी बहरून उठला होता याचा मला अभिमान आहे. लोकायत म्हणजे इहलोकविषयक प्रणाली. हे चार्वाक लोक अतिशय  नीतिमान होते. मृदुभाषी होते . सभ्य होते .  चार्वाक चे मराठी भाषांतर गोड बोलणारा असे होते.  चारू म्हणजे  गोड, मनाला रुचेल तेच आणि वाक्‌ म्हणजे सांगणारा. 

 धर्म निंदा - ईश्वर निंदा सोडुन -  त्यांचा कोणताही गुन्हा आणि पाप आस्तिकांच्या ग्रंथात सुद्धा नोंदवलेले  नाहीत.  य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील प्राणी  हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतीचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. युक्तिवाद आणि चर्चा करणार्या  एका चार्वाक पंथी ब्राम्हणाला - तू तर राक्षस आहेस - असे संबोधून आस्तिक ब्राम्हणांनी  जाळून मारल्याची नोंद महाभारतात येते . 

परंतु चर्वाकांच्या हिंसेचे - चोरीचे - खुनशी वृत्तीचे एकही उदाहरण मिळत नाही . एकही नाहि. विरोधकांच्या ग्रंथात हि नाही.  






 जीवनाचे ध्येय | असे सुखप्राप्ती
सुखानेच तृप्ती | माणसांना



- विंदा करंदिकर (चार्वाक दर्शन )




शरीराला आणि इंद्रियाना होणार्या सुखमय भावनाना चार्वाक सुख मानतात . इथे सारा न्याय प्रत्यक्ष हेच प्रमाण असा आहे. मनाला होणारा संतोष  हि त्याना अभिप्रेत आहे. प्रियेच्या बाहुपाशात खरे सुख अशा अर्थाची चार्वाक वचने आहेत. 

जगाला बुद्धिवाद आणि नैतिकता शिकवणारे चार्वाक अतिशय सुखाने स्वत:चे संसारि आणि व्यावसायिक जीवन जगत असावेत असे मानायला जागा आहे. 

 गम्मत म्हणजे काही सवाई चार्वाक देखील तयार होते . लोकायतचे अपडेटेड व्हर्जन म्हणजे :

 तत्त्वोपप्लव सिंह अर्थात विचारावर झडप घालणारा सिंह .

  तत्त्वोपप्लव सिंह हा चार्वाक मताचा एकच ग्रंथ सध्या शिल्लक दिसतो .  त्याचा लेखक  जयराशी भट्ट हा  सातव्या  शतकांत होऊन गेला.  वैदिक, बौद्ध आणि जैन यांच्यावर या ग्रंथात  सडकून टीका केलेली आहे. पण तो चार्वकालाहि जुमानत नाही . इझम किंवा विचारसरणि चूक आहे . अनुभव आणि विवेक बुद्धी माणसाला प्रयत्न पूर्वक मिळवता येते . सर्व लोकांच्या अधिकतर हितासाठी विवेक वापरावा . चार्वाका सकट  कोणत्याही पुस्तकी इझम च्या नादि लागू नका असे जय्रराशी भट्ट स्पष्टपणे सांगतो . चार्वाक मताला जुनाट म्हणणारे नवे चार्वाक जन्माला येत होते . यालाच   विज्ञान निष्ठ विचार  असे म्हणतात .  भारतात लघु रुपाने  का होईना - पण हा विचार होता . हे अतिशय अभिमानस्पद आहे 

आजचे बुवा, बाबा, जटा, दाढ्या -  जनावरांचे मूत्र पिणारा भारत - हे  वास्तव पाहिले कि चार्वाक येथे जन्मावा हे  एक आश्चर्यच वाटते .   जणु चमत्कार !  




(प्रस्तु लेख अनेक संदर्भ ग्रंथ व इंटर्नेट वरील उपलब्ध लेखांचे एकत्रित संकलन आहे.  संस्कृत श्लोकांचे मराठी रुपांतर लेखकाने केले आहे. )


अधिक वचनासाठी संदर्भ ग्रंथ :


चार्वाक - इतिहास आणि तत्त्वज्ञान - सदाशिव आठवले (प्राज्ञपाठशाळा - वाई)
'आस्तिकशिरोमणी चार्वाक' - आ.ह. साळुंखे
भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित 
लोकायत - स. रा. गाडगीळ - लोकवाङ्मय गृह
वेध चार्वाकाचा - उदय कुमठेकर - अभय प्रकाशन नांदेड.
चार्वाकमंथन - संपादकः उदय कुमठेकर - परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग्, पुणे 
चार्वाकवाद आणि अद्वैतवाद - डॉ. प्रदीप गोखले - टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 
लोकायत (इंग्रजी ) - देविप्रसाद चट्टोपाध्याय - 
सर्वदर्शनसंग्रह - माधवाचार्य - प्र. फोटोझिंको प्रेस पुणे, (शासकीय प्रकाशन)
'भारतीय जडवाद'  -  राममनोहर लोहिया 
'जडवाद' - मानवेन्द्रनाथ रॉय ( अनुवाद : बा.र. सुंठणकर  ) कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे 
'विचारमंथन - स.रा. गाडगीळ 

६ टिप्पण्या:

  1. यावत जीवेत सुखं जीवेत ऋणम कृत्वा घृतं पिबेत .
    कर्ज काढा आणि तूप प्या - हा श्लेक चार्वाकाचा आहे कि त्याची चेष्टा करणयासठी आहे याचा उलगडा होत नाही .
    कारण तश्याच अर्थाचा दुसरा श्लोक मिळतो -

    यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्तिमृत्युरगोचर:।
    भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

    अर्थ : जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सुखा समाधानाने जगा.
    एकदा शरीराची राख झाली कि सारे संपते .
    पुनर्जन्म चांगला मिळावा या भितिपोटि कर्मकांड करत बसू नका .

    समजा तोश्लोक चार्वाकाचा धरला - जरी कर्ज काढून तूप प्यायले तरी त्यात काही चूक नाही . कर्ज बुडवायला चार्वाक सांगत नाही . आपण सारेच कर्ज घेत असतो आणि तूप पीत असतो - ऐश करत असतो - त्यात अनैतिक काही नाही . उधारी हा जगाचा आदिम नियम आहे . ती फेडली जाते म्हणून प्रथा शिल्लक आहे. कर्ज हे माणसाच्या माणसावर च्या विश्वासाचे उत्तम उदाहाण आहे . अपवाद वगळता कर्जे फेडली जातात . त्यासाठी देव धर्म काही लागात नाही . लोकलज्जा पुरते

    उत्तर द्याहटवा
  2. मी प्रयन्त्त केला चार्वाक प्रमाणे राहण्याचा पण माणसाचा स्वभाव लोभी असल्यामुळे तो शेवटी फसतोच .. आज जगात सर्वात जास्त प्रमाणात चार्वाक प्रमाणेच जगणारे लोक आढळतील. शेवटी मन शांतीसाठी सम्यक मार्गाच हितकार ठरतो.

    उत्तर द्याहटवा
  3. Uday Kalgaonkar चार्वाकच्या आधी कितीतरी वर्षे कपिल मुनींनी सांख्य दर्शनातून हे सर्व विचार मांडले होते , चार्वाक दर्शनात टिका जास्त आहे व बुद्धीप्रामाण्यवाद कमी . .

    याउलट सांख्य दर्शनात बुद्धीप्रामाण्यवाद कितीतरी अधिक ठासून व विस्तारीतपणे मांडलेला आहे .

    संपूर्ण बुद्ध दर्शन हे सांख्य दर्शनावर आधारित आहे यावर तज्ञांचे एकमत आहे , चार्वाक दर्शनातही सांख्य दर्शनाचा आधार आहे .

    बुद्धीप्रामाण्यवाद म्हणजे नास्तिकपणा हे ढोंग आहे .
    6 mins · Like

    Abhiram Dixit चार्वाक आधी कि कपिल आधी ? खात्री करून घ्या . दुसरे म्हणजे सांख्याचे जग प्रकृती आणि पुरुष या दोन संकल्प्नावर आधारित आहे . हे काल्पनिक आहे शास्त्रीय नाही . कापिलाचे सांख्य दर्शन ईश्वर नाकारते - पण ते बुद्धिवादी नाही . प्रकृती आणि पुरुष या यांङ्ग - यिंग सारख्या कल्पनेने ईश्वराला रिप्लेस केले आहे . प्रकृती आणि पुरुष अथवा यांङ्ग - यिंग विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही .

    तत्त्वोपप्लव सिंह हा चार्वाक मताचा एकच ग्रंथ सध्या शिल्लक दिसतो . त्याचा लेखक जयराशी भट्ट हा सातव्या शतकांत होऊन गेला. हा ग्रंथ केवळ टीकात्मक नाही यात नास्तिक नैतिकतेची सखोल चर्चा आहे

    उत्तर द्याहटवा
  4. काही प्रश्नोत्तरे

    प्रश्न : चार्वाक का नाकारला गेला ? एव्हढा भारी होता तर लोकांनी स्वीकारला का नाही ? म्हणजेच त्यात काही तरी प्रोब्लेम आहे : -

    उत्तर ) चार्वाक हे भारतीय संस्क्रुतित नाकारलेले दर्शन नाहि. महाभारतात द्रौपदी धर्माला सांगते की" मी वडीलांच्या घरी भावाबरोबर याचा अभ्यास केला आहे". तसेच कौटलीय अर्थशास्त्रात व न्यायसूत्रात लोकायताचा आदराने उल्लेख केला आहे. सांख्य, योग व लोकायत एका पंक्तीत बसवले आहेत. त्यामुळे ते नाकारले गेले हे - टिकले नाही हे १००% सत्य नाही . आजही भारतात नास्तिकांचि संख्या लक्षणिय आहे . चार्वाकाचे अनेक विचार आस्तिकांनिहि स्वीकारले आहेत . उदा : वेदप्रामाण्य किंवा धर्म ग्रंथाचे प्रामाण्य ऐहिक व्यवहारात न मानणे . भारताचे सरकार (अपवाद वगळता ) धार्मिक कायदे करत नाही . पंचाग पाहून मूहुर्त शोधत नाही . पुनर्जन्म मानून योजना आखत नाही . हा चार्वाकाचा जय आहे. त्यास पराभूत म्हणुन त्याज्य असा निकष लावणे चूक आहे.
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    प्रश्न : आज चार्वाकाचे अनुयायी व्हावे का ?

    उत्तर ) नाही . चार्वाक हा हजार वर्शापुर्विचा विचार आहे त्यात भरपूर सुधारणा आवश्यक आहेत . चार्वाकापेक्षा डोकिंन्स अधिक अनुकरणीय आहे यात मला शंका नाही . बुद्धीवाद्याने कोणाचे हि अनुकरण करू नये . ज्ञान मिळवावे आणि विवेकाने आचरण करावे . पण गुड फोर नथिंग म्हणत चार्वाकाचा द्वेष करण्याचे काहीच कारण नाही . पूर्वज म्हणून कोणाचा अभिमान बाळगायचा असेल तर ( खर तर अभिमान अस्मिता हि फालतुगिरी आहे तरीही ) कोण्या पूर्वजाचा अभिमान बाळगायचा असेल तर , वेदाच्या कर्त्यांपेक्षा, इतर कोणत्याही भारतीय दार्श्निकापेक्षा मी त्यातल्या त्यात मी चार्वाकाला अधिक मानीन . तो आधुनिक विचाराच्या जास्त जवळ वाटतो .

    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    प्रश्न अनुमान पे दुनिया कायम है - चार्वाकाने फक्त प्रत्यक्ष हेच प्रमाण मानले . अंदाज - अनुमान का नाकारले ?

    उत्तर ) प्रत्यक्ष आणि प्रमाण याविषयी आपले काही गैरसमज दिसतात. चार्वाकाचा (आजच्या मराठी भाषेतल्या) अनुमानाला विरोध नाही . यज्ञात प्राणि मारून तो स्वर्गात पोचतो अशा फसव्या (तत्कालीन रूढ ) अनुमानाला विरोध आहे. विशिष्ट प्रकारचे अनुमान चार्वाकाला मान्य आहे. दोन घटनामधिल संबंधाचा नुसताच अंदाज बांधु नये . त्यासाठी अंदाज बांधण्याचि शास्त्रीय पद्धती निर्माण करावी असे चार्वाक म्हणतो . हि अनुमानाची वैद्न्यानिक पद्धत आहे. अर्थात त्यात अनेक अपडेट्स आवश्यक आहेत या अनुमानाच्या शास्त्रीय पद्धतीला आज आपण गणित म्हणतो . चार्वाक काळी गणिताची तितकी वाढ झाली नव्हती . सर्व दर्शन संग्रह या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात माधवाचार्यांनि चार्वाकाच्या अनुमानाची सविस्तर चर्चा केली आहे आणि चार्वाकाला काठावर का होईना पण पास केले आहे त्यासाठी अग्नी आणि धूर हे रूपक वापरले आहे.
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    प्रश्न : रिचर्ड डोकिंस च्या मेमेटिक्स संकल्पने नुसार जो सांस्कृतिक विचार टिकत नाही तो फालतू असतो . चार्वाक फालतू आहे का ?

    उत्तर ) रिचर्ड डोकिन्स चा मी चाहता आहे. अनुयायी सुद्धा आहे. त्याच्या मेमेटिक्स च्या कल्पनेत अनेक दोष आहेत . त्यासाठी किती काल प्रमाण मानायचा ? अजून १०० वर्षांनी चार्वाक विजयी झाला तर काय ? रिचर्ड डोकिन्स स्वत:च अनेक अर्थाने चार्वाक वादि आहे. माणुस- प्राणि हा मोलेक्युलर मशीन आहे असे डोकिन्स मानतो . विश्व अचेतन आहे - जड आहे त्यात चैतन्य नाही असे चार्वाक मानतो . कोणतेहि तंत्र्द्न्यान नसताना चार्वाक बराच डोकिन्सच्या जवळ आहे.

    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    चार्वाकाबद्दल पुर्ण लेख वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा : -

    उत्तर द्याहटवा
  5. The Best sir. Its my luck & proud that I am connected with your blog because things which I would have understood after reading several books on various subject that you have brought on single page. Really hats off to you.
    One more thing I would like to mentioned here that my concept and understanding about gandhiji and partition is also changed in 180 degree after reading your blog GANDHI HATYA BHAG 1 & 2.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *