४ मार्च, २०१४

मुकादमांचां इस्लाम (त्यांच्या चष्म्यातून : भाग ६ )

चश्म्याविषयी थोडेसे :

या मालिकेत आपण आजपर्यंत पाच महत्वाच्या ऐतिहासिक मुस्लिम महापुरुशांच्या विचारांना स्पर्श केला आहे . एका अर्थाने पाच अतिशय वेगवेगळ्या दृष्टीकोनातून इस्लाम धर्मा कडे पाहिले आहे.  परकाया प्रवेश करून - दुसर्‍याच्या नजरेतून तिसर्‍याकडे पहाण्याची तर मजाच काही और आहे. माझ्या लहानपणी मिस्टर इंडिया नावाचा एक सिनेमा आला होता. हातात वैज्ञानिक जादूचे घड्याळ बांधून अनिल कपूर अद्रुष्य व्हायचा. काहि केल्या तो मोगँबोला दिसायचा नाही. मग मोगँबो लाल काचेच्या चश्म्यातून बघायचा. अनिल कपूर दिसायचा. आपण चश्म्याचा रंग बदलला की नजरेसमोरचे दृष्य बदलते. कविळ झालेल्याला पिवळे दिसते म्हणतात. एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहाता येते हा मुद्दा आहे. जर एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहाता येत असेल तर विचारधारांकडे आणि धर्मप्रवाहांकडे तर हजारो दृष्टीकोनातून पाहता येईल . अकबरापासून हमीद पर्यंतचे हे थोर पुरुष आणि धर्माकडे  पहाण्याचा त्यांचा चष्मा आपण पाहिला. त्यात एक गोष्ट सामाईक आहे. कोणती बर ?



 अकबर हा मध्ययुगातला अतिश्रीमंत बादशहा आहे . तो फिरायला निघाला कि त्यामागे चवर्या - पंखे घेऊन धावणारे हुजरे  , सुगंधी सरबते घेऊन फिरणार्या दासी , अकबराची स्तुती करायला पाळलेले पगारी भाट यांच्या लवाजम्याची झुंबड उडते आहे . पण हिंदुस्तानच्या  शहन्शहाचे यात मन  रमत नाही . खलबतखाने - इबादत खाने उघडत अकबर धर्मचीकीत्सक बनतो . धर्मचीकीत्सेची पहिली पायरी म्हणूनच कि काय ? पण तो धर्मसहीष्णू बनतो आणि सर्व धर्मांना समान न्याय देण्याचे धोरण अवलंबतो . पण अकबराची जिज्ञासा त्याला त्याला तिथे थांबू देत नाही … त्याने इबादत खान्यात सर्व धर्माच्या धर्मप्रेमी मंडळी ची तडाखेबंद भाषणे आणि चावरे युक्तिवाद ऐकले आहेत . थोड्या बर्या आणि थोड्या वाईट अशा गोष्टी सगळ्याच धर्मात असतात असे त्याला वाटू लागते . मग तो म्हणू लागतो कि जनतेच्या भल्यासाठी धर्मात हस्तक्षेप करणे हा राजाचा अधीकार आहे … अशाप्रकारे अकबर सेक्युलर आणि बुद्धिवादी बनत सगळ्या धर्मातले त्याला आवडणारे घटक एकत्र करून दिने इलाही नावाचा नवाच धर्म काढतो ! मुल्ला मौलवी विरोध करतात तर अकबर त्याना चोप देऊन कंदाहारच्या बाजारात विकून टाकतो.

 जे जे अकबराला जमते ते ते हमीद दलवाइना जमू शकणार नाही . त्याना कधी मौलविंच्या धर्मांधते समोर क्षणिक  माघार हि घ्यावी लागेल. काही सामर्थ्य सत्तेचे आहे . पण काही गोष्टी हमीद अशा करेल … जे अकबराला शक्य नाही …. कारण  काही सामर्थ्य काळाचेही आहे . अकबराने दिने इलाहिचा पुढचा प्रेषित म्हणून स्वत:लाच जाहीर केले होते . हमीद तसे करणार नाही. हमीद लोकशाही , धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची भाषा बोलेल. तरी हमीद आणि अकबराला जोडणारा एक धागा आहेच  फकस्त विद्रोही , बंडखोर , नास्तिक , पाखंड नव्हे…  तो धागा आहे उपेक्षेचा . स्वधर्मियाकडून झालेल्या दुर्लक्षाचा आणि पराजयाचा . आणि वेदनेचा . …. अकबराच्या दिने इलाही या धर्माला पंचवीसहून कमी अनुयायी मिळावेत आणि हमीदच्या   मंडळात आज विसही  सत्यशोधक  मुसलमान उरू नयेत ! हा योगायोग खचितच नाही. इस्लामचा गड  चिरेबंदी आहे काय ?
एका अर्थाने आहे आणि एका अर्थाने नाही. धर्माचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ निघू लागले कि त्यातले एकमेवत्व आणि अद्वितियत्व कमी होवू लागते. इस्लामचा अर्थ काढणार्या वेगवेगळ्या विचार शाळा ( थॉट स्कूल्स ) आहेत. असगर आली इंजिनिअर किंवा अब्दुल कादिर मुकादम या विद्वानांचीही  एक शाळा आहे. इस्लामचा पुरोगामी अर्थ काढणारी हि शाळा आहे. अब्दुल कादिर मुकादम यांच्या विचाराविषयी प्रस्तुत लेखात पहायचे आहे. त्यांनी हमीद दलवाई सोबत मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नावर काम केले आहे . त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे पुरोगामी संस्कार आहेत आणि या पुरोगामी चष्म्यातून ते इस्लाम कडे पाहतात . त्यांच्याशी प्रत्यक्ष केलेल्या चर्चेतून आणि चंद्रकोरीच्या छायेत या त्यांच्या पुस्तकावरून प्रस्तुत लेख बेतला आहे .



झाकीर नाईकांचे  इस्लामी गणित : 

झाकीर नाईक हे एक टीव्ही प्रसिद्ध मौलवी आहेत. त्यांची सर्व धर्माच्या शास्त्रांवर व्यासंगी पकड आहे . मुळ  धर्म इस्लाम आहे . वेदात , गीतेत , धम्मपदात , त्रीपिठकात आणि बायबलात इस्लामच आहे . त्यात आता भेसळ झाली आहे . कुरान मध्येच एकमेव सत्यधर्म आहे म्हणून कुराणाकडे चला असा त्यांचा आग्रह आहे. भेसळ युक्त धर्माचा त्याग करून सर्वांनी मुसलमान झाले पाहिजे असे ते सांगत असतात. यु ट्यूब वरच्या एका मुलाखतीत झाकीर नाईकांना मुलाखत कर्ता एक प्रश्न विचारतो. तुम्ही जगभर आणि भारतात इस्लामचा प्रचार करता . सर्वांनी मुसलमान व्हावे असे म्हणता . तुम्हाला इतर देशात तुमच्या धर्माचा प्रचार करायचा अधिकार हवा आहे . मग सौदी अरेबियात इतर धर्माना प्रचाराचा अधिकार का नाही ?

झाकीर नाईक उत्तर देतात : कारण २ +२ = ४ हे आम्हाला माहित आहे . खरा आणि एकमेव सत्यधर्म इस्लामच आहे हे आम्हाला माहित आहे . ज्याना स्वत:चा धर्म खरा आहे कि नाही ? २ +२ = ५ कि ६ कि ४ हे माहित नाही . ते  सर्वच उत्तरे खरी आहेत असे मानतात . सर्वच धर्म खरे आहेत असे मानतात. त्यामुळे ते आम्हाला प्रचार करू देतात आणि आम्ही इतराना करू देत नाही . देणार नाही . इतरांच्या सहिष्णुतेचा असा धार्मिक अर्थ मौलवी झाकीर नाईक काढतात.




मुकादामांचे प्रमेय 

लबाड झाकीर नाईक स्वत:चे बीजगणित सिद्ध करण्यासाठी कुराणच्या ज्या आयती सांगत आहेत त्यांचा मुळातला अर्थ सहिष्णू आहे. झाकीर आणि तत्सम मौलवी इस्लामला बदनाम करत आहेत . इस्लाम हा शांततेचा धर्म आहे . स्त्री पुरुष समानता , लोकशाही , सर्व धर्म समभाव , बुद्धिवाद या सार्याचा कुराण पुरस्कार करते . मौलाना आझाद , इकबाल आणि असगर आली इंजिनिअर यांचे दाखले देत अब्दुल कादिर मुकादम आपले प्रमेय सिद्ध करतात . कुराणात बुरख्याची सक्ती नाही . इतरांनी मुसलमान झालेच पाहिजे असा आग्रह कुराणात नाही हे मुकादम कुराणातल्याच आयतींचे वेगळे अर्थ सांगत पटवून देतात . पण मुकादम तिथेच थांबत नाहीत . तर  कुराणातच प्रेषितांनी आपल्या धर्म ग्रंथाच्या मर्यादा स्पष्ट केल्या असून जर कुराणात किवा हदिसामध्ये आधार मिळाला नाही तर बुद्धीचा वापर करण्यास सांगितले आहे . पवित्र कुराणाने दिलेली हि बुद्धिवादाची शिकवण आहे असे मुकादम आग्रहाने सांगतात .

कुराण पुरोगामी आहेच पण भारताचे संविधान सार्वभौम आहे असे एका टीव्हीवरील मुलाखतीत अब्दुल कादिर मुकादमांनी प्रतिपादित केले होते . धर्म ग्रंथ आणि संविधान यात अंतर आले तर संविधानाचा सेक्युलर कायदा पाळायचा आहे असा अर्थ यातून निघतो . मुकादमान्चा हा विचार सर्वार्थाने क्रांतिकारक आहे . कुराणाच्या अध्ययनातून हा पुरोगामी विचार स्फुरला आहे असे मुकादमांचे प्रमेय आहे . या प्रमेयाच्या आधारे झाकीर नाईकांचे इस्लामी गणित खोडून काढता येते असे मुकादम मानतात . आणि त्यासाठी लेखही लिहितात .



मोरेंची भूमिती 

मौलाना मौदुदि हे जमाते इस्लामीचे संस्थापक त्यांच्या वचनांचा आधार घेत प्रा शेषराव मोरे यांनी मुस्लिम मनाचा शोध हा ग्रंथ लिहिला आहे . प्रेषितांचे चरित्र , कुराण , हदीस त्यावर जमाते इस्लामीच्या विचारवंताची भाष्ये याची मोजपट्टी वापरत मोरेंनी आपला ग्रंथ लिहिला . त्यातल्या प्रत्येक वाक्याला यातलेच संदर्भ दिले आहेत. इस्लाम हा एकमेव सत्यधर्म आहे . इतर धर्म भेसळयुक्त आहेत . इतर धर्मियांना मेल्यानंतर जहन्नुम / नरकाची आग आहे . आणि इमानदार मोमिनाना जन्नत . पण इस्लाम केवळ पारलौकिक धर्म नाही ती एक जीवनपद्धती - "दिन" आहे. इस्लामी कायद्याचे राज्य - शरीयतचे राज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येक मुस्लिमाने (प्रयत्नांची पराकाष्ठा ) जिहाद केला पाहिजे. दार उल हार्ब चे रुपांतर दार उल इस्लाम मध्ये व्हावे म्हणून प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रेशित मुहम्मदाचा आदर्ष  ठेवून (मक्का काल - मदिना पूर्वार्ध ) शक्ती कमी असताना इतर  धर्माशी तडजोड करून इस्लामचा प्रचार केला पाहिजे . आणि शक्ती वाढली कि काफिरांशी युद्ध (जिहाद बा सैफ) केले पाहिजे . इस्लामचे एकमेव अद्वितीय आग्रही धर्मरूप मोरे मौदुदिंचे दाखले देत सांगतात. मोरेंच्या पुस्तकाला जमाते इस्लामीच्या विद्वानांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते लिहितात " मोरेंनी इस्लामचा अर्थ मराठी वाचकाना सांगून फार मोठे काम केले आहे . त्याबद्दल त्याना शाह फैसल पारितोषिक दिले पाहिजे. मोरेंवर अल्ला स्वर्गातून पुष्पवृष्टी करेल"  असे म्हणत जमाते इस्लामीच्या पंडितांनी प्रस्तावनेत शेषराव मोरेंचे कौतुक केले आहे आणि त्याचे निष्कर्ष योग्य ठरवले आहेत . इस्लाम केवळ परमेश्वराची आराधना करत स्व चा / जगाचा शोध घेणारा धर्म नाही . इस्लाम हा एकमेव सत्यधर्म - दिन आहे. राजकीय भूगोल बदलणारा धर्म आहे अशी मोरेंची भूमिती आहे . आणि जे जे मुस्लिम कुराणाच्या आधारे पुरोगामित्व सांगतात ते वस्तुत: मक्का काळातले तडजोडीचे इस्लामी राजकारण करत धर्म रक्षण करत असतात कारण मदीनाकालीन युद्धासाठी त्याना शक्ती वाढवायची असते असा मोरेंच्या भूमितीय सिद्धान्ताचा व्यत्यास आहे.



मुकादमांचा पवित्र लढा 

इस्लामचा टोकाचा अर्थ काढणारे झाकीर नाईक , जमाते इस्लामी एका बाजूला आणि शेषराव मोरे दुसर्या बाजूला . मुकादमांचा  संघर्ष दोघांशी आहे . कुराण अपरिवर्तनीय एकमेव आहे अशी मुकादमांची लेखी भूमिका आहे पण कुराणाचे अर्थ काढणार्या वेगवेगळ्या परंपरा आहेत . त्यातल्या पुरोगामी परंपरांकडे मोरे दुर्लक्ष करतात आणि जमाते इस्लामीचीच री ओढतात असा मुकादमांचा आक्षेप आहे . त्यांचा आक्षेप १००% खरा आहे . मुकादामानी केवळ मोरेंचे खंडन केलेले नाही , जमाते इस्लामी , झाकीर नाईक आणि शहाबुद्दीनच्या भूमिकान्वारही टीका केलेली आहे . इस्लामचा उपयोग करून जर मुस्लिम समाजात पुरोगामित्व आणता येत असेल तर त्याला विरोध का करता ? असा खडा सवाल अब्दुल कादिर मुकादम विचारतात . मराठीतून या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे . मुकादमांचे विचार अकबराशी जुळत नाहीत … हमिदशीही जुळत नाहीत . पण स्वधार्मियांकडून उपेक्षेचि वेदना या तिघाना जोडते . असगर अलींच्या किंवा मुकादमांच्या
तुलनेत  जमाते इस्लामीची मान्यता मुस्लिम समाजात कितीतरी अधिक आहे . आणि जमाते इस्लामीचा मुस्लिम मान्य  इस्लाम मोरे रिपीट करत आहेत. बहुसंख्य मुस्लिम समाज मुकादामांचे  लिखाण मराठीतून असल्याने त्यांच्या पुरोगामी विचारापासून वंचित राहतो आहे. मात्र हा विचार  मराठी वाचाकांपार्यात पोचवण्याचे पवित्र बुद्धिवादी कार्य ते पार पाडत आहेत. शेवटी कुठेतरी सुरवात करावी लागते. अकबर आणि हमीद दलवाइच्या बाबतीत जसा सत्तेच्या आणि कालाच्या सामर्थ्याचा विचार केला तसाच विचार असगर आली इंजिनिअर किंवा अब्दुल कादिर मुकादम यांच्या बाबतीत केला पाहिजे .

 एक सवाल : 

कुठल्याही धर्माच्या अनुयायाला मला एक प्रश्न विचारायला आवडतो . बरोबर काय ? आणी चूक काय ? याचा फैसला आम्ही    कायद्याच्या - संविधानाच्या आणि मुख्यत : विवेक बुद्धीच्या तराजूत करतो. धर्माच्या तराजूत करत नाही. तुम्ही हा फैसला कोणत्या तराजूत करता ? हा प्रश्न झाकीर नाइकना आहे , जमाते इस्लामीला आहे आणि अब्दुल कादर मुकादम यांनाही आहे .

" कुराणातच विवेकबुद्धी  सांगितलि असल्याने मी विवेकवादी आणि बुद्धिवादी आहे " असे उत्तर ते देणार नाहीत याची खात्री आहे!

काही असो शेवटी उपयुक्तता वादाला महत्व आहे. धर्माचा उपयोग करून आणि त्याचेच वेगवेगळे पुरोगामी अर्थ काढून मुस्लिम स्त्रियांच्या तलाकचा , पोटगीचा प्रश्न  सुटला तर कोणाला नको आहे ? पाहुया !

पुन्हा चष्मा : 

जगाकडे पाहण्याचा आपला एक दृष्टीकोन असतोच . तो इतर लोकान्पेक्षा वेगळा असतो . दुसर्याच्या चश्म्याबद्दल आदर बाळगणे . त्याच्या चष्मा घालायच्या हक्काबद्दल आदर बाळगणे हे पुरोगामित्वाचे मुलभुत लक्षण आहे. माझा स्वत:चाही एक चष्मा आहेच . तरी शक्य तितक्या तटस्थपणे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व सहा भाग वेगळा विचार करू पाहणार्या इस्लाम विचारवंतावर आहेत    . हि सर्व माणसे विचारी आणि भल्या हृदयाची आहेत . मुस्लिमांचे हित कोणता चष्मा पाहतो याचा निर्णय वाचकांवर सोपवत आहोत . आणि हित म्हणजे काय ? याचाही निर्णय वाचकांनीच करायचा आहे .


अब्दुल कादिर मुकादम यांची विचारसरणी बुद्धिवादी नाही हे पहिले समजून घ्यावे लागेल . मुस्लिम समाजात सुधारणा करण्यासाठी इस्लामचा वेगळा आधुनिक अर्थ काढावा इतकाच त्यांचा सुधारणावाद मर्यादित आहे. कुराणाचे प्रामाण्य ते नाकारत नाहीत - स्वीकारतात . कुराणात स्त्री स्वातंत्र्य आहे , समता आहे , सहिष्णुता आहे, शांतता आहे ..... लोकशाही , विज्ञान निष्ठा सारे काही आहे ! म्हणून मुस्लिमांनी त्याचे पालन केले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. 

धर्माचा उपयोग धर्माविरुदची तलवार म्हणून करण्याचा त्यांचा मानस आहे . धर्माचे काही बिघडत नाही . तलवार मात्र बोथट झाली आहे . मुकादम एकटे नाहीत . असगर आली इंजिनिअर इत्यादी मुस्लिम समाज सुधारकांचि देखील हीच भूमिका आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हमीद दलवाईंच्या बुद्धिवादी विचाराचे दफन करून - असगर अली स्वीकारले आहेत.

हि भूमिका मोडरेट सनातन्यांच्या हिंदु धर्म विषयक भूमिकांशी तंतोतंत जुळते . हिंदु धर्मात मुळात अस्पृश्याता नव्हती , चमत्कार नव्हते - धर्म चांगला - काही ठेकेदार वाइट अशी ती भूमिका आहे.

हिंदु किंवा मुस्लिमात धार्मिक अतिरेकी हे संख्येने फार कमी असतात. हे तथाकथित मोडरेट लोक्स धर्माची ढाल तयार करून अतिरेक्यांचे संरक्षण करतात. धर्म चांगला आचार वाइट हि भूमिका बुद्धिवादी नाही - धार्मिकच आहे. मोडरेट दुष्ट नाहीत .... सज्जन आणि सभ्य आहेत .... त्यांच्या मार्गाने धर्मसुधारणा होईल असा अंधविश्वास त्याना आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html


२ टिप्पण्या:

  1. साधी गोष्ट आहे –

    झाकीर नाईक यांना इस्लामचा प्रचार करायचा आहे, जगात फक्त इस्लाम राहिला पाहिजे असे त्यांना वाटते. जगातील लोकांनी एकाच अल् लाह ला देव मानले पाहिजे – आधी जे काही आहे ते सर्व सोडून दिले पाहिजे ही त्यांची इच्छा आहे. त्यांचे शस्त्र आहे “बोलणे”. ते शस्त्र वापरून त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते स्वत:चे तर्क मांडत असतात – त्या तर्कासाठी जे सोयीचे आहे ते घेतात, गैरसोयीचे आहे ते टाकून देतात. हे सर्व “क्लासिक इस्लाम”च्या परंपरेप्रमाणे आहे.

    मुकादम आपल्या समाजाला थोडे कमी पोथीनिष्ठ, थोडे कमी धर्मवेडे, बनवून काही सामाजिक अन्याय कमी करायचा प्रयत्न करत आहेत. ते करताना अति धर्मभोळ्या समाजाला चुचकारावे लागेल ही त्यांची भूमिका आहे. चुलाण पेटलेले असताना त्यावर उकळणारे गरम पाणी थेट तोंड घालून प्याले पाहिजे असा आग्रह सोडून “Straw वापरली तरी चालेल” असा मध्यममार्ग काढायचा त्यांचा प्रयत्न आहे. ते करताना चुलाणाखालची आग कमी करायचा प्रयत्न न करता केवळ वरून उकळत्या पाण्यावर फुंकर मारून ते थोडे थंड करायचा त्यांचा प्रयत्न आहे.

    तर प्रा. मोरे यांनी अभ्यासकाच्या भूमिकेतून जे दिसले ते मांडले आहे. इस्लामची सुरुवात कशी झाली – त्यामागील समाजव्यवस्था, सत्ताकारण, उद्दिष्टे यांचा अभ्यास करून त्यांनी आपले मत मांडले आहे. इस्लामचे एकचालकानुवर्तित्वाचे मॉडेल (एकमेव नेता जो एकमेव देवाचा प्रतिनिधी आहे – त्याचे अनुयायित्व, ज्यात संपूर्ण विश्वास अत्यावश्यक आहे - त्यासाठी इह/पर लोकांसाठी आश्वासने आहेत, प्रश्न विचारणे पाप आहे – त्यासाठी इह/पर लोकांमध्ये मिळणाऱ्या शिक्षेची धमकी आहे, विस्तार हे एकमेव उद्दिष्ट आहे) सत्ता संपादन आणि विस्तारासाठी कशामुळे यशस्वी ठरत गेले त्याचे विश्लेषण त्यांनी केले आहे.

    या तिन्हीपैकी खरे काय – योग्य काय – उपयुक्त काय, हे ज्याने त्याने आपआपल्या इच्छे / सोयी प्रमाणे ठरवायचे.

    उत्तर द्याहटवा
  2. म्हणजे वेदात सर्वकाही आहे असे म्हणून वेदांच्या ऋचांचा आर्यसमाजी पुरोगामी अर्थ काढतात तसेच काहीसे...बरोबर?

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *