१ जाने, २०१४

मैन ऑफ द इयर - केजरीवाल !

मैन ऑफ द इयर - केजरीवाल !

हे वर्ष गाजवले  ते अरविंद केजरीवाल ने ! भारतीय राजकारणाचे डायनामिक्स बदलू शकते हे पट्ठ्याने सिद्ध केले . जात , धर्म , पैसे , दबाव , ताकद या सर्वाच्या पेकाटात लाथ घालूनही भारतीय मतदार मत टाकू शकतो  हे त्याने सिद्ध केले . मुस्लिमांना भगवा बागुलबुवा दाखवून मते मागणारे कोन्ग्रेसी आणि  साधन शुचितेच्या गप्पा मारणारा भाजप या दोघांनीही आता आत्म परिक्षण करावे . नाही तर -  या नाही तर - पुढच्या लोकसभेत दुसरा एखादा झाडू पुन्हा चालेल. आज आप चा चेहरा शहरी आणि उत्तर भारतीय आहे . चार पाच वर्षात असे अनेक आप तयार होतील .आणि इझम ने आंधळे बनलेले वाहून जातील .  कडवे हिंदु , कट्टर दलित आणि सनातनी मुस्लिम आजही फेसबुकावर आपचा निषेध करण्यात धन्यता   मानताना दिसतात .

आप च्या अट्ठाविस जागंपैकि नउ जागा या राखीव मतदार संघातुन आलेल्या आहेत. म्हणजे १/३ जागा ! दिल्लीत १२ जागा राखीव आहेत . कोन्ग्रेस ने २००८ च्या निवडणुकीत या बारा पैकी ९ जागा जिंकल्या होत्या. या राखीव जागात वाल्मिकी या दलित समाजाचे बर्यापैकी प्राबल्य  आहे.  या निवडणुकीत या बारापैकी  कोन्ग्रेस ला " शुन्य "  जागा मिळाल्या .  ९ राखीव जागांवर आप विजयी झाली आणि ३ जागांवर भाजप . मोदींचे इतर मागासवर्गीय असणे भाजप ला लाभदायक  ठरले असणार . याहून मोठा फटका बसला तो बसप या मायावती पक्षाला . गेल्या निवडणुकीत या पक्षाने दलित प्राबल्य असलेल्या २० मतदार संघात २०% मते मिळवली होती . यावेळी पाच टक्के मते मिळाली आणि शून्य जागा मिळाल्या  . दलित मतदार नेहमीच जातीच्या नावाने मत टाकेल आणि  …. आप हा शहरी उच्च मध्यम वर्गियांचा पक्ष आहे……  या दोन्ही प्रकारच्या अंधश्रद्धेतून लवकर बाहेर पडले पाहिजे . ज्या पक्षाचे १/३ आमदार राखीव जागातले आहेत त्यांना उच्च जातीय वगैरे म्हणणे हा शुद्ध वेडेपणा आहे . आणि असे पक्ष लोकशाहीच्या राजकारणात राखीव जागाविरोधी वगैरे ठरू  शकतात -- असे मानणार्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रियेचे मुलभूत ज्ञानही नाही असे खेदाने म्हणावे लागेल .

मुस्लिम मतदान आजपर्यंत एकट्ठा आणि धार्मिक मुद्द्यांभोवती फिरत राहिलेले आपण पाहिलेले आहे. कोन्ग्रेसाने  मुस्लिमांची मते मागताना कायम धर्माची जपमाळ ओढुन राजकारणात धर्म आणला. शहाबानो केस मध्ये मुस्लिम सनातन्यांसमोर शेपुट हलवणार्या राजीवच्या कोन्ग्रेस ने त्यांचा भंगार प्स्युडो सेक्युलारीझम  पाळण्यासाठी बाबरीचे कुलूप उघडुन आम्ही हिंदु कट्टर वाद्यांसमोरहि कसे नतमस्तक आहोत हे दाखवून दिले. अंधश्रद्धा विरोधी कायदा होण्यासाठीही महाराष्ट्रात एक नरबळी जावा लागला. कोन्ग्रेस चा भित्रा सेक्युलारीझम यावेळी बर्याच  मुस्लिम मतदारांनी नाकारला आणि आप ला भरभरून मते दिली. पुरानि  दिल्लीतल्या  मुस्लिम बहुसंख्य भागात आप ला भरपूर मते मिळाली आहेत.  केजरीवाल मुस्लिमांच्या धार्मिक नेत्यांना जरूर भेटले पण या निवडणुकीत त्यांनी एकही धर्मिक मुद्दा घेतला नव्हता.  मुस्लिम आरक्षण , हिंदुत्व वाद्यांची भीती , मोदिंवर विशिष्ट टिका - यापैकी काहीही अरविंद केजरीवाल याने केले नाही. मुस्लिम मतदारांना भय किंवा धार्मिक लांगुलचालन या दोनच प्रकारे मतदान करता येते या अंधश्रद्धेचेहि निर्मुलन केलेले बरे. अरविंद केजरीवाल आणि कंपनिने तिरंगा हातात घेऊन भारत माता कि जय ! आणि वंदे मातरम ! अशा घोषणा देत प्रचार केला आणि त्यांच्या या सेक्युलर वंदे मातरम ला मुस्लिमांनी साथ दिली हे समजून घेतले पाहिजे . विशेषत: हिंदुत्व वाद्यांनी !

बहु संख्य / जन  हिंदु  समाज सहसा जात धर्म न पाहता मत देतो. भारतात याच कारणाने सेक्युलारीझाम टिकला आहे. निवडणुका सेक्युलर मुद्द्यांवर लढवल्या गेल्या पाहिजेत. वीज, पाणि , रोजगार , अन्न , शिक्षण असे सेक्युलर मुद्दे निवडणुकी दरम्यान चर्चिले गेले पाहिजेत. या मुद्द्यांवर निवडणुका जिंकता येतात. पैसे ,  दारू न वाटता आणि हिंदु धर्म कि जय न करताही निवडणुका जिंकता येतात . अरविंद केजरीवाल ने कोणत्याही मंदिराचे नाव न घेता - प्रशासन , देशभक्ती ,  भ्रष्टाचार अश्या सेक्युलर मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या.  मेणबत्ती वाले म्हणुन   सुशिक्षित वर्गाला माजोरडेपणे हिणवले जाते . हा माजोरडेपणा भयानक राजकीय चूक म्हणुन सिद्ध झाला आहे .


कोन्ग्रेस चे   तुश्टिकरणाचे धार्मिक , जातीय  नाटक किंवा भाजपाचा कडवा उजवा  राष्ट्रवाद या दिल्लीच्या  निवडणुकीत तरी प्रभावी ठरला नाही . जरी केजरीवाल ने भाजप पेक्षा कमी जागा मिळवल्या…।  तरी हे यश २ वर्षातले आहे . आणि निवडणुकीत केवळ २० कोट रुपयात मिळाले आहे . बाकी दोन्ही पक्षांचा अधिकृत खर्चच हजारो कोटीत आहे. अनधिकृत खर्च न विचारलेला बरा !

आप चा भर सोशल मिडियातल्या प्रचारावर होता आणि कोन्ग्रेसाला त्याचे महत्व समजले नाही . हे खरे आहे . पण केवळ सोशल मिडियावर निवडणुक जिंकता येत नाही . मुंबईत शिवसेना का आणि कशी पसरली ? वीज , पाणि , रेशन कार्ड असे जिव्हाळ्याचे मुद्दे त्या काळचे शाखाप्रमुख जातीने लक्ष घालून सोडवत असत . कोणती हि अडचण आली तर चाळीतला मुंबैकर सेनेच्या  शाखाप्रमुखाकडे तक्रार घेऊन जात असे . आणि त्या काळी शाखाप्रमुखाही इरेला पेटुन छोट्या छोट्या अडचणी सोडवत असत . आप चे  कार्यकर्ते गेली दोन वर्षे अशी स्थानिक    छोटी कामे प्रामाणिक पणाच्या इरेला पेटुन करत आहेत .


पैशाच्या मोहजालात अडकलेले कोन्ग्रेस , राष्ट्रवादी सारखे सरंजामदारांचे पक्ष हे समजू शकत नाहीत . पण बाकीच्यांना केजरीवाल राज्याची निवडणूक महापालिकेच्या मुद्द्यांवर जिंकला एव्हढे समजले तरी पुरे !

कदाचित आप दिल्लीबाहेर वाढणार नाही . पण भारताचे राजकारण , समाजकारण , प्रचार कारण बदलते आहे . एव्हढे समजले तरी पुरे !

बाकी केजरीवाल अमेरिकेचे हस्तक आहेत , मुस्लिमांचे हस्तक आहेत , राखीव जागा विरोधी आहेत वगैरे प्रचार चालू आहे … त्या सर्वांना  येत्या दहा वर्षात  झाडून काढले जाणार आहे . भारत बदलतो आहे . इतिहास कुस पालटतो आहे . हे चलन वळण न समजणारे इझम   पंडित  बाराच्या भावात जाणार आहेत . निदान गेले तरी पाहिजेत !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *